बीड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी मोच्रेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आघाडी घेतली आहे. त्यांनी मागील चार दिवसांपासून जिल्हा िपजून काढला. अंबाजोगाई, केज, बीड, आष्टी, माजलगाव या तालुक्यातील पन्नासपेक्षा जास्त गावांमध्ये जवळपास पावणेदोनशे कोटी रुपयांच्या विकासकामांचा उद्घाटनांचा नारळ फोडला असून ठिकठिकाणच्या कार्यक्रमात मंत्री मुंडे या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपला यश देऊन राज्यात राजकीय सन्मान वाढवावा, असे आवाहन करीत आहेत. राजकीयदृष्टय़ा महत्त्वाच्या असलेल्या आणि प्रमुख आध्यात्मिक स्थळे श्री क्षेत्र नारायणगड, गहिनीनाथगड, चाकरवाडी संस्थानांना भेटी देऊन ग्रामविकास विभागाकडून मंजूर करण्यात आलेल्या निधीच्या कामांची उद्घाटनेही त्यांनी केली. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे यांना दोन वर्षांपूर्वी मंत्रिमंडळात प्रमुख चार खात्यांच्या मंत्रिपदाची संधी मिळाली. पंधरा वर्षांनंतर सत्ता आल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा वाढली. मात्र सरकारबरोबर पंकजा मुंडे यांचे गुत्तेदारी कार्यकर्त्यांची राजकीय संस्कृती बदलण्याच्या धोरणामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. दोन वर्षांत मंत्री मुंडे यांनी सार्वजनिक कामांसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. परळी-बीड-नगर रेल्वेसह जलयुक्त शिवार, महामार्गाचे चौपदरीकरण, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यांचे मजबुतीकरण यासाठी जवळपास पाच हजार कोटी रुपयांपर्यंतचा निधी आला. मात्र यानंतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. आष्टी, पाटोदा, शिरुर नगरपंचायतीतील पराभवानंतर दोन महिन्यांपूर्वी झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीतही अपेक्षित यश आले नाही. गेवराई, धारुर, माजलगाव या पालिकेत स्थानिक नेतृत्वाने आपले वर्चस्व कायम ठेवले. मात्र मुंडे यांचे होमपीच असलेल्या परळी नगरपालिकेत भाजपला दारुण पराभव पत्कारावा लागला. महिनाभर खासदार प्रीतम मुंडे यांनी शहर िपजून काढले. मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी सभा घेतल्या, तरी यश मिळाले नाही. केंद्रात, राज्यात सत्ता असताना परळीतील पराभव मंत्री मुंडे यांची राजकीय अस्वस्थता वाढवणारा ठरला. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत पराभवाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मुंडे यांनी आता विकासकामांबरोबर थेट संपर्क अभियानच सुरू केले आहे. राज्यात माझा राजकीय सन्मान वाढवण्यासाठी निवडणुकीत साथ देण्याचे आवाहनही केले आहे.