लवकरच प्रकल्पाला प्रारंभ - जितेंद्र आव्हाड औरंगाबाद : म्हाडाच्या औरंगाबाद मंडळातर्फे चिकलठाणा, नक्षत्रवाडी व ऑरिक सिटी येथे ५ हजार ५०० परवडणाऱ्या सदनिकांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. लवकरच या तीनही ठिकाणी गृहनिर्मिती प्रकल्पाला प्रारंभ केला जाणार आहे. या माध्यमातून औरंगाबादवासीयांना म्हाडाच्या माध्यमातून परवडणारी घरे लवकरच उपलब्ध होतील, असा विश्वास गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. म्हाडामार्फत खासगी विकासकांबरोबर संयुक्त भागीदारी प्रकल्प राबवून परवडणाऱ्या सदनिकांच्या उभारणीवर भर देण्यात येईल, असेही आव्हाड म्हणाले. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) सुंदर, सुबक, गुणवत्तापूर्ण अशा प्रकारची हक्काच्या घरांची स्वप्ने पूर्ण करून देते. यासाठी पारदर्शक अशा लॉटरी पद्धतीने विजेत्यांची निवड करते. आगामी काळातही औरंगाबादेतील विविध नियोजित योजना गतिमानतेने म्हाडा पूर्ण करेल, असा विश्वास उद्योग मंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. औरंगाबाद? गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या औरंगाबाद, हिंगोलीतील सदनिकांच्या विविध योजनेंतर्गत ८६४ सदनिकांच्या ऑनलाइन सोडत कार्यक्रमात औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई व गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड ऑनलाइन बोलत होते. या वेळी योजनेचे ऑनलाइन उद्घाटन आव्हाड यांनी मुंबई येथून केले. तर गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, औरंगाबाद मंडळाचे मुख्य अधिकारी अण्णासाहेब शिंदे, म्हाडाचे वित्त नियंत्रक विकास देसाई, मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी सविता बोडके यांचीही ऑनलाइन उपस्थिती होती. औरंगाबाद येथील म्हाडा कार्यालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश एस. जी. शेटे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी अनिल थोरात आदींची उपस्थिती होती.