आमदार जलील यांचा आरोप; राष्ट्रवादीने आरोप फेटाळला औरंगाबाद शहरात एमआयएमचा वाढता प्रभाव रोखला जावा, तसेच पक्षात फूट पडावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने एमआयएमच्या काही नगरसेवकांना ३० लाख रुपये ‘ऑफर’ केली असल्याचा खळबळजनक आरोप आमदार इम्तियाज जलील यांनी गुरुवारी केला. येत्या सोमवारी (दि. १६) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दुष्काळ परिषदेसाठी औरंगाबाद येथे येत आहेत. या पाश्र्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकीय हालचालींना वेग आल्याचे त्यांनी सांगितले. औरंगाबाद महापालिकेत एमआयएमचे २५ नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून पक्षात फूट पडावी, असे प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसने काही नगरसेवकांना ३० लाखांची ऑफर दिली. पक्ष बदलावा, या साठी त्यांच्याकडून प्रयत्न होत आहेत. मात्र, पुढची २५ वर्षे एमआयएम औरंगाबादमधून हलणार नाही, असे जलील म्हणाले. शहरात काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना मुस्लीम समाजाचे मोठे पाठबळ पूर्वी होते. गेल्या विधानसभा निवडणुकीपासून या दोन्ही पक्षांच्या मुस्लीम मतांमध्ये कमालीची घट झाल्याने दोन्ही पक्षातील वरिष्ठांमध्ये चिंता व्यक्त होत होती. काँग्रेसने जिल्हाध्यक्षपद आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे दिले, तर शहराध्यक्षपद माजी आमदार नामदेवराव पवार यांच्याकडे सुपूर्द केले. मुस्लीम आणि मराठा समाजाला हा पक्ष आपला आहे, असा संदेश देण्याचा प्रयत्न पदाधिकारी निवडीतून करण्यात आला. याच दरम्यान काँग्रेसकडून एमआयएमच्या नगरसेवकांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न सुरू होता. आमदार जलील यांनी राष्ट्रवादीकडूनही असे प्रयत्न आर्थिक ताकद लावून केले जात असल्याचा आरोप गुरुवारी केला. आमदार जलील यांच्या आरोपांच्या अनुषंगाने पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांना विचारले असता, ‘जबाबदार लोकप्रतिनिधींनी अत्यंत निखालस खोटा आरोप करावा, याचे वाईट वाटते. त्यांचा पक्ष फोडण्याची आम्हाला काहीएक गरज वाटत नाही. त्यांचे नगरसेवक सर्वच पक्षांच्या संपर्कात असतात, हे कदाचित जलील यांना माहीत नसावे. जाणीवपूर्वक भाजपला मदत होईल, असाच ते नेहमी प्रयत्न करतात’ असे त्यांनी सांगितले.