जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचा मेळावा, भारतीय जनता पक्षाची बठक आणि राष्ट्रवादीच्या मुलाखती असे तिन्ही कार्यक्रम बुधवारी पार पडले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्याचीच ही नांदी असून या तिन्हीही राजकीय पक्षांनी केलेले दावे प्रत्यक्षात कसे खरे उतरवायचे याचे आव्हान कार्यकर्त्यांपुढे आहे. जिल्हा परिषदेवर कोणत्याही एका पक्षाची सत्ता येण्याची सुतराम शक्यता नसली तरीही शिवसेनेला भगवा फडकवण्याची तर भाजपला ‘शतप्रतिशत’ यश मिळविण्याची आणि राष्ट्रवादीला आपली सत्ता कायम टिकविण्याची स्वप्ने पडू लागली आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढविण्यासाठी इच्छुक राष्ट्रवादीच्या तब्बल ८८२ कार्यकर्त्यांनी मुलाखती दिल्याचा दावा या पक्षाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला आहे. राज्यात विरोधी पक्ष असलेली राष्ट्रवादी मावळत्या जिल्हा परिषदेत सत्तास्थानी आहे. आपली सत्ता पुन्हा टिकविण्याचे सर्वात मोठे आव्हान हे राष्ट्रवादीसमोर आहे. पुन्हा आपलाच झेंडा फडकेल असा विश्वास राष्ट्रवादीचे पक्षनिरीक्षक माजी मंत्री सुरेश धस यांनी व्यक्त केला आहे.

शिवसेना व भारतीय जनता पक्ष यांच्यात युती होण्याची कोणतीच शक्यता या निवडणुकीत नाही. शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला जिल्ह्यात कायमच दुय्यम दर्जाची वागणूक दिली आहे. भारतीय जनता पक्षाची जिल्ह्यात नसलेली ताकद हेच त्याचे मुख्य कारण आहे. आजवर भाजपला जिल्ह्यात एक अंकीही संख्याबळ मिळवता आले नाही. अगदीच दोन-चार जागा पदरात पाडून घ्यायच्या आणि त्या जोरावर जिल्हा परिषदेत एखादे पद मिळवायचे असे आतापर्यंतचे भारतीय जनता पक्षाचे स्थान राहिले आहे. त्यातही जिल्हा परिषदेत भाजपचे जे सदस्य निवडून येतात त्यांची आपापल्या गटात ताकद असते. पक्षापेक्षा स्वतच्याच ताकदीवर ते निवडून येतात. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला शिवसेनेने आतापर्यंत कधीच जिल्ह्यात बरोबरीची वागणूक देण्याचा प्रश्नच नाही, असा दावा शिवसेनेचे नेते करीत असतात. शिवसेनेने काल झालेल्या मेळाव्यात जिल्हा परिषदेवर व पंचायत समित्यांवर भगवा फडकविण्याची घोषणा केलेली आहे. कार्यकर्त्यांनी एकजुटीने राहावे, आपसात भांडू नये असा सल्ला नवे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला. परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. याचे कारण परभणी लोकसभेवर सातत्याने शिवसेनेची सत्ता आहे. परभणी विधानसभेतही शिवसेनेला निर्वविाद यश मिळते. अशावेळी जिल्हा परिषदेवर सुद्धा शिवसेनेची सत्ता आली पाहिजे. यासाठी नव्या पालकमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना उत्साहीत करणारे भाषण केले. आजवर जिल्हा परिषदेत शिवसेनेने निर्णायक अशी सदस्यसंख्या कधीच मिळवलेली नाही. त्यामुळे या जिल्हा परिषदेत शिवसेनेला चांगले राजकीय यश मिळणार काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी कालच्या मेळाव्यात भारतीय जनता पक्षावर थेट टीकेची तोफ डागली आहे. भारतीय जनता पक्ष हा बेचव तर शिवसेना ही झणझणीत असल्याची भाषा या मेळाव्यात केली गेली.

भारतीय जनता पक्षाच्या बठकीत परभणी जिल्ह्याचे संपर्कमंत्री बबनराव लोणीकर यांनी भाजपला ५० टक्के जागांची मागणी केली आहे. शिवसेना कोणत्याही परिस्थितीत भाजपला एवढय़ा जागा देण्याची शक्यता नाही. लोणीकर यांनी कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करताना मोदी सरकारचे निर्णय, राज्य सरकारची कामगिरी असे विविध विषय सांगितले. कोणत्याही परिस्थितीत  जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात आली पाहिजे असे म्हणताना जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी एकदिलाने कामाला लागावे असाही कानमंत्र लोणीकरांनी दिला आहे. त्यांनी भाषणात राष्ट्रवादीवर टीका केली.