सोलापूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग डिसेंबपर्यंत पूर्ण होणार सोलापूर- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गाचे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील काम वेगाने सुरू असून डिसेंबरअखेर पर्यंत हा मार्ग पूर्ण होईल. सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गाचे तीन टप्पे आहेत. या तीन टप्प्यामध्ये सहा टोल प्रस्तावित करण्यात आले आहेत. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर टोल आकारणीला सुरुवात होणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील पहिल्या टप्प्यातील सोलापूर जवळील तामलवाडी ते कळंब तालुक्यातील रत्नापूर दरम्यान सुरू असणाऱ्या ८५ किलोमीटरच्या कामाचे संपूर्णत: भूसंपादन झाले आहे. प्रस्तावित टोलसाठी प्रतिवाहन रक्कम किती हे मात्र अजून ठरलेले नाही. काम पूर्ण झाल्यानंतरच ही कारवाई केली जाते, असे राष्ट्रीय महामार्ग विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. उस्मानाबाद, बीड, जालना व औरंगाबाद जिल्हय़ांना जोडणारा या रस्त्याचे काम वेगाने सुरू असून टप्पा क्र.१ मधील प्रस्तावित काम जवळपास पूर्ण होत आले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ८५ किलोमीटरमध्ये २५ गावातील २५५.५९ हेक्टर क्षेत्राचे संपादन करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे जमीन हस्तांतरीत केल्यानंतर कामाला सुरुवात करण्यात आली. या टप्प्यातील ५३९.२९ कोटींपैकी ४६६ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. अद्यापि ७३ कोटी एक लाख रुपयांची रक्कम संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. कारण शेतकऱ्यांनी त्यांची आवश्यक ती कागदपत्रे यंत्रणेकडे दिलेले नाहीत. त्याचबरोबर टप्पा क्र.२ मधील कार्यवाहीदेखील पूर्ण करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्हय़ातील तेरखेडा ते पारगाव हा ४१ किलोमीटर, बीड जिल्हय़ातील चौसाळा ते गेवराई तालुक्यातील खामगावपर्यंत, जालना जिल्हय़ातील शहागड ते लेभेंवाडी दरम्यान ४५ किलोमीटर रस्त्यांसाठी ७९ गावांमध्ये ६५२ हेक्टर भूसंपादन पूर्ण झाले आहे. केवळ ४८.२१ हेक्टर भूसंपादन बाकी आहे. रस्त्याचे कामाला कमालीचा वेग असल्याने लवकरच हे काम पूर्ण होईल, असा दावा उपायुक्त महेंद्र हरपाळकर यांनी केला. पहिल्या दोन टप्प्यातील भूसंपादनाचा वेग अधिक असला तरी टप्पा तीन मधील काम काहीसे मागे आहे. मात्र, आता चुकांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नसल्याने हे काम लवकर होईल, असे सांगितले जात आहे. या महामार्गावर सहा ठिकाणी टोल प्रस्तावित करण्यात आले आहेत. सोलापूर जिल्हय़ात एक, उस्मानबाद जिल्हय़ातील येडशी व पारगाव, बीड जिल्हय़ात पाडळशिंगी, औरंगाबाद जिल्हय़ातील पाचोड, कन्नड, भांगसीमाता गड येथे टोल प्रस्तावित करण्यात आले असून जळगाव जिल्हय़ातही एक टोल प्रस्तावित आहे. प्रगतीचा आलेख निधीमध्ये जिल्हा प्राप्त तरतूद वितरण उस्मानाबाद २५८.९४ १८४.०६ बीड ५७५.५५ ४७०.२५ जालना १७२.२९ १६३.९९ औरंगाबाद २७९.०९ ७५.४२ (सर्व आकडे कोटींमध्ये) भूसंपादनाची प्रगती (आकडे हेक्टर आर-मध्य) जिल्हा संपादित क्षेत्र राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरीत क्षेत्र उस्मानाबाद १३४.५२ १०१.०५ बीड २९७.०२ २९७.५० जालना ०९४.०० ०७९.३० औरंगाबाद १४१.०० १४१.००