मराठवाडय़ात पावसाने हुलकावणी दिल्याने राज्यातील साखर उत्पादनामध्ये २० टक्क्यांची घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काही जिल्हय़ांमध्ये उसाचे वाढे चाऱ्यासाठी उपयोगात आणले जात असून त्याचे दर कमालीचे वधारले आहेत. ३ हजार रुपये टनापर्यंत वाढे विक्रीला जात आहेत. त्याचा ऊस उत्पादकांना लाभ होत असला तरी पशुपालक छोटा शेतकरी हैराण झाला आहे. मराठवाडा, विदर्भ, सोलापूर जिल्हय़ातील उसाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या वर्षी राज्यात ९ लाख ४ हजार हेक्टरावर ऊस लागवड झाली होती. त्यातून ७२ लाख टन साखर उत्पादन होईल, असे मानले जात होते. मात्र, तब्बल ४० दिवस पावसाने दडी मारल्याने मराठवाडय़ातील साखर कारखान्यांची कोंडी फुटण्याची शक्यता कमी झाली आहे. मराठवाडय़ात लागवडीखालील ऊस कारखान्याला देण्याऐवजी त्याचा उपयोग चारा म्हणून होत आहे. त्याचे दरही कमालीचे वाढले आहेत. खरिपात मक्याची वाढ खुंटली आहे. त्यामुळे न वाढलेला ऊस चारा म्हणून विक्री केला जात आहे. बीड जिल्हय़ातील आष्टी, पाटोदा तालुक्यातील पशुपालकांची संख्या मोठी आहे. आष्टी तालुक्यातील चोभा निमगावचे बाळासाहेब पोकळे म्हणाले की, ऊस पुरेसा वाढला नाही. त्यामुळे तो अडीच ते तीन हजार रुपये टन या दराने चाऱ्यासाठी उपयोगात आणला जात आहे. आमच्याकडच्या भागात काहीसा चारा उपलब्ध आहे. पण जेथे पाणी नाही, तेथे परिस्थिती अधिक वाईट आहे. येत्या आठवडय़ात पाऊस आला नाही तर चित्र अधिक भेसूर होईल, असे सांगण्यात येते. नॅचरल शुगरचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे म्हणाले,की दुष्काळजन्य परिस्थिती आहे. आजच २५ टक्के ऊस उत्पादनामध्ये घट होईल, असे वाटत आहे. त्यामुळे साखर कारखान्यांची पुन्हा एकदा आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे. एका बाजूला कारखाने अडचणीत आले तरी ऊस उत्पादकांचे तसे नुकसान होणार नाही. ऊस चाऱ्यासाठी विक्री होत असल्याने त्यातून लाभ मिळत आहे. मळी, शुद्ध अल्कोहोलच्या दरात घसरण साखर कारखान्यातील उपपदार्थांच्या किमतीमध्ये कमालीचे बदल झाले आहेत. महिनाभरापूर्वी मळी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने त्याचे दर वधारले होते. तब्बल ९ हजार रुपये टनांपर्यंत मळीची व शुद्ध अल्कोहोलची किंमत होती. ती आता ३ हजार ५०० रुपयांपर्यंत घसरली आहे. इथेनॉलची मागणीही घटली आहे. त्याचा दर आता ३९ रुपयांवरुन ३६ रुपये प्रति लिटरपर्यंत खाली आला आहे.