बसच्या पाससाठी पसे नसल्याच्या कारणावरून लातुरात एका मुलीने आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी राज्यात स्वाती अभय योजना सुरू केली. या योजनेंतर्गत जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून २४ हजार विद्यार्थ्यांना मोफत पास योजनेचे कवच मिळाले आहे. सरकारकडून महामंडळाला मोफत पासच्या बदल्यात रक्कम मिळणार असली, तरी महामंडळालाही ४ महिन्यांत योजनेंतर्गत जवळपास एक कोटी रुपयांचा भार सोसावा लागणार आहे.
एस. टी. महामंडळाकडून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात जाण्यासाठी सवलतीचे पासेस दिले जातात. पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलींसाठी अहल्याबाई होळकर योजनेतून मोफत लाभ दिला जातो, तर दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या अकरावी ते पदवीपर्यंतच्या महाविद्यालयीन मुला-मुलींना सवलतीची सुविधा दिली जात होती. मात्र, लातुरात एका विद्यार्थिनीने पाससाठी पसे नसल्यामुळे आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर परिवहनमंत्र्यांनी त्याच मुलीच्या नावाने राज्यभर मोफत पास योजना राबविण्याचा निर्णय १ नोव्हेंबर २०१५पासून सुरू केला. या योजनेंतर्गत जिल्ह्यात २४ हजार विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे. यात बीड ४ हजार २९४, धारूर ३ हजार १९४, माजलगाव ३ हजार २९१, परळी २ हजार ५७२, गेवराई २ हजार ६६२, पाटोदा १ हजार ७८१, आष्टी २ हजार ९४५, अंबाजोगाई ३ हजार ९९१ अशा आठ आगारांमधून २४ हजार ७३० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
मोफत पास योजनेमुळे बीड विभागाला जानेवारी ते एप्रिलपर्यंत २ कोटी ९७ लाख ६ हजार ५५६ पकी सरकारकडून १ कोटी ९० लाख ५ हजार ३६१ रुपये मिळणार आहेत. त्यामुळे एस. टी. महामंडळालाही या योजनेतून ९९ लाख १ हजार १९५ रुपयांचा भार सोसावा लागणार आहे.