वडिलोपार्जित जमिनीच्या सातबाऱ्यावरील व्यवहार बेकायदेशीर असल्याचा शेरा कमी करण्यासाठी तहसीलदारांनी शेतकऱ्याकडे चक्क एक लाख २५ हजारांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीनंतर तहसीलदारांना लाच घेताना अटक केली. याप्रकरणी तहसीलदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगापूरचे (जि. औरंगाबाद) तहसीलदार अविनाश महादेव शिंगटे व महसूल सहायक अशोक बाबूराव मरकड यांनी आपेगाव येथील तक्रारदाराकडे १ लाख २५ हजार रुपयांची मागणी केली होती. तहसीलदार शिंगटे यांनी तक्रारदाराच्या वडिलोपार्जित जमिनीमधील सातबाऱ्यावरील कूळ कायद्याप्रमाणे असलेला व्यवहार बेकायदेशीर असल्याचा शेरा कमी करण्यासाठी ही लाच मागितली होती. सातबाऱ्यावरील कूळ कायद्याप्रमाणे व्यवहार बेकायदेशीर असल्याचा शेरा कमी करण्यासाठी तहसीलदारांकडून सव्वा लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आल्याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा लावला होता. मागणी केलेल्या सव्वा लाखापैकी ७० हजारांची लाच स्वीकारताना औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसीलदार शिंगटे आणि महसूल सहायक मरकड यांना रंगहाथ पकडले. शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक मारुती पंडित, पो. नि. विकास घनवट यांच्या पथकाने ही कारवाई केली.