धर्मग्रंथातील एकम सत्चा संदेश सांगत कीर्तनातून प्रबोधन औरंगाबाद : वारकरी सांप्रदाय हा वेदप्रणीत आहे. गीता-कुराण या हिंदू आणि मुस्लीम धर्मातील पवित्र ग्रंथांमधून एकम सत् अर्थात ईश्वरी तत्त्व एकच असल्याचा संदेश देण्यात आल्याचे अभ्यासाअंती पटल्यानंतर ताजुद्दीन नूर महंमद उर्फ सच्चिदानंदगिरी महाराजांना मानवता हाच खरा धर्म आणि सर्व जातीधर्माना सामावून घेणारा वारकरी सांप्रदाय जवळचा वाटला. त्यातूनच त्यांनी आपला भाव पांडुरंगी दृढ करून कीर्तनसेवेतून प्रबोधनाचे कार्य अविरत सुरू ठेवले आहे. राज्यासह देशाच्या विविध प्रांतांमधून ताजुद्दीन महाराज हे कीर्तन-प्रवचनासाठी वलयांकित नाव झालेले आहे. नाथ षष्ठीला पैठणची आणि आषाढीला पंढरपूरची वारी हा महाराजांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला तो पांडुरंगाच्या ओढीनेच. महाराजांचा संत वचनांसह गीता, कुराणाचाही गाढा अभ्यास असून त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी वारकरी गर्दी करतानाही दिसतात. हिंदू-मुस्लीम धर्मामधील द्वेषाची दरी ही केवळ परस्परांची भाषा येत नसल्यामुळे अधिकच रुंदावल्याचे महाराज सांगतात. मुस्लीमांना संस्कृत आणि हिंदूंना उर्दू-अरबी भाषा अवगत झाल्यानंतर गीतेतील श्लोक व कुराणांमधील हदीस, आयते यांचा अर्थबोध होईल आणि एकमेकांविषयी तयार झालेली द्वेषाची जळमटे गळून पडतील, असा विश्वास महाराजांना वाटतो. जन्माने मुस्लीम असले तरी वारकरी सांप्रदायाची जीवनशैली अंगीकारलेले ताजुद्दीन महाराज नित्य हरिपाठ, भजन-कीर्तन आणि वारीलाही जाण्याच्या परंपरेचे कसोशीने पालन करत आहेत. मूळचे घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थजवळील बोधलापुरी हे त्यांचे गाव. गावासह पैठणमध्येही त्यांनी एक आश्रम काढून त्यातून वारकरी सांप्रदायाचा प्रसार-प्रचाराचे काम केले जाते. सर्वच संतांच्या अभंग गाथांचा त्यांचा अभ्यास आहे. महाराज सांगतात, लहानपणापासूनच वारकरी सांप्रदायाचे संस्कार झाले. हरिपाठ म्हणणे, भजन-कीर्तन ऐकणे यात मनाचा ओढा पाहून कुटुंबीयांचा विरोध पत्करून एके दिवशी आळंदी गाठली. तेथून हृषीकेशला पोहोचलो. त्र्यंबकेश्वरला आलो. तेथे अनुग्रहित होऊन वारकरी सांप्रदायाच्या अभ्यासासाठी ज्ञान ग्रहण केले. मूळचा मुस्लीम असल्याने कुराणाचाही अभ्यास केला. गीतेचाही अभ्यास घडल्याने दोन्ही धर्मातील पवित्र ग्रंथात मानवतेच्या कल्याणाचे संदेश असल्याचे जाणवले. कुराणातील पहिल्या अ्ध्यायातील सुरुवातीलाच आलिफ लाम मिम जालिकल किताबों ला रहे बा हुद्दल्लिल मुत्तकिना लजीन, असे नमूद केले आहे. तर गीतेमध्ये सर्व धर्मान् परित्याज्य मामेकम शरणम वज्र्य, असे श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगतात. या दोन्हींचा अर्थ- मी एक आहे. मला कोणीही नाही. मीच सर्व धर्मामध्ये नटलेलो आहे. मला अनंत नावे आहेत पण मी एक तत्त्व आहे. तू मला शरण ये. फक्त तुझे मन माझ्याकडे लाव, असा संदेश दोन्ही धर्मातून दिला गेला आहे. संतांनीही कोणत्याही जिवाचा न घडो मत्सर, असाच मार्ग दाखवला आहे. मात्र, आजही अनेक जण एकमेकांचा द्वेष करण्यासाठी सरसावतात. एका धर्मातील व्यक्ती दुसऱ्या धर्माची महती सांगत असल्यामुळे आपल्याला आजही त्रास होतो. कोणाचेही पाठबळ मिळत नाही. सुख-दुखाविषयी जाणून घेत नाहीत, अशी खंतही ताजुद्दीन महाराज व्यक्त करताना मानवातील कुप्रवृत्ती सर्वत्र असल्याचे अधोरेखित करतात.