औरंगाबादमधील कांचन ज्वेलर्स हे दुकान चोरट्यांनी फोडले असून दुकानातील २५ किलोच्या चांदीच्या मौल्यवान वस्तू चोरट्यांनी पळवल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. औरंगाबादमध्ये महिन्याभरात चोरीची ही चौथी मोठी घटना आहे.

जालना रोडवरील कॅनॉट प्लेस येथे कांचन ज्वेलर्स हे दुकान आहे. रिकबलाल हिंगड हे या ज्वेलरी शॉपचे मालक आहेत. हे दुकान गेल्या काही दिवसांपासून बंद होते. शहरातील दुसऱ्या ठिकाणी हिंगड यांना दुकानाचे सुरु करायचे होते. जागा मिळाल्यावर ते कॅनॉट प्लेसमधील सामान तिथे नेणार होते.

गुरुवारी पहाटे चोरट्यांनी हिंगड यांचे दुकान फोडले आणि दुकानातील २५ किलोचे चांदीचे दागिने व मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारला.  या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून  दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरेही बंद होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

औरंगाबादमध्ये महिनाभरात चोरीची ही चौथी मोठी घटना आहे. यापूर्वी जुलैमध्ये सातारा परिसरातील दोन घटनांमध्ये एकूण ३६ तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी करण्यात आली होती.