जंगलाचे वैभव असलेल्या वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वन विभागाला विशेष उपाययोजना कराव्या लागत आहेत. २०१२-१३मध्ये केवळ १ लाख रुपये खर्च यावर करावा लागला, तो यंदा ४० लाखांपेक्षा अधिक झाला आहे. दुष्काळाच्या झळा वन्य प्राण्यांनाही बसत असून त्यांना पाण्याची सोय उपलब्ध व्हावी, या साठी वन विभागाने ४० लाख खर्च करून वनतळे, पाणवठे तयार केले. यातून किनवट, माहूर भागातील वन्य प्राण्यांची तहान भागवली जात आहे. इसापूर धरणातून पाणी सोडण्यात आल्याने त्याचा विशेष फायदा झाल्याचे वन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यात किनवट, माहूर, भोकर व हिमायतनगर परिसरात मोठय़ा प्रमाणावर जंगल आहे. किनवट, माहूर तालुक्यांतील जंगलात अनेक वन्य प्राणी आहेत. या वन्य प्राण्यांसाठी पूर्वी पनगंगा नदी तसेच अन्य बंधाऱ्यांचा उपयोग होत होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून नदी धरणातील पाणीसाठा मृत झाल्याने वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. नांदेड उपवन संरक्षक कार्यालयांतर्गत १२ परिक्षेत्रीय कार्यालये आहेत. पकी अप्पारावपेठ, मुखेड व देगलूर वगळता अन्य ९ परिक्षेत्रीय कार्यालयांत पाणवठे, वनतळे व मातीनाला बांधकाम करण्यात आले. माहूर, मांडवी, किनवट, इस्लामपूर, बोधडी, हदगाव, हिमायतनगर, भोकर, नांदेड येथील परिक्षेत्रिय कार्यालयांतर्गत ४० लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च करुन वन्य प्राण्यांच्या पिण्याची सोय झाली आहे. नांदेडचे उपवनसंरक्षक सुजय दोडल यांनी सांगितले की, आवश्यकतेप्रमाणे वनतळे व पाणवठे तयार करण्यात आले. बहुतांश भागातील वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. इसापूर धरणाचे पाणी सोडल्यानंतर जेथे मातीनाला बांधकाम झाले, तेथील पाणीपातळीत वाढ झाली आहे. पाईपची गळती आहे तेथे पाणवठा तयार करून वन्य प्राण्यांच्या पिण्याची सोय केली. अनेक भागातील वनतळ्यांचे खोलीकरण केल्याने पाण्याचा संचय चांगला झाला. आगामी काळात आणखी निधी खर्च करण्याची विभागाची तयारी आहे. काही भागात मोर, लांडोर, कोल्हा यासारखे प्राणी पाणवठे सोडून शहर किंवा नागरी वस्तीकडे येत आहेत, ही बाब खरी आहे. परंतु ते केवळ पाणी उपलब्ध नाही म्हणून येत नाहीत. ज्या भागात गरज आहे तेथे आणखी पाण्याचे स्रोत निर्माण करण्याची आमची तयारी असल्याचे ते म्हणाले.