पैठण तालुक्यातील जुने कासवन गावात शनिवारी पहाटे एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली. मृतांमध्ये पती, पत्नी एका लहान मुलीचा समावेश आहे. तर एक लहान मुलगा जखमी झाला आहे. संभाजी उर्फ राजू नारायण नेवारे (वय ३५), त्यांची पत्नी आश्विनी (वय ३०)व मुलगी सायली( वय १०) , अशी मृतांची नावे आहेत. तर राजूचा मुलगा सोहम ( वय ६) हा जखमी असून त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पैठण पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर पवार यांनी दिली. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक गोरक्ष भामरे यांनीही भेट दिली असून, औरंगाबाद येथून श्वानपथकही पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, घटनास्थळी तपास केला असता प्रथमदर्शनी चोरीच्या उद्देशाने हत्या करण्यात आल्याचे कुठलेही धागेदोरे सापडले नसून, पूर्ववैमनस्यातून हत्याकांड घडवण्यात आले असावे का ?, या दृष्टीने तपास करत आहोत, असे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी सांगितले. दुपारी एकच्या सुमारास मृतांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करून मृतदेह , नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पैठण पोलिसांकडून सांगण्यात आले. पैठण तालुक्यातील गोदावरी काठावरील जुने कावसन हे गाव असून, शहरापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे पैठण शहरासह तालुक्यात या एकाच कुटुंबातील तिहेरी हत्याकांडाच्या घटनेने खळबळ उडाली.