मोहन भागवत यांनी राष्ट्रपतीपदाच्या स्पर्धेत नसल्याचे स्पष्ट केले असले तरी शिवसेनेने पुन्हा एकदा राष्ट्रपतीपदासाठी मोहन भागवत यांचे नाव पुढे केले आहे. हिंदू राष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरावे असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडले आहे.  रविवारी औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यात उद्धव ठाकरेंनी राष्ट्रपतीपदासाठी मोहन भागवत यांचे नाव पुढे केले. भारत हिंदू राष्ट्र व्हावे, अशी इच्छा आहे. आता बऱ्याच वर्षांनी देशात सत्तापरिवर्तन झाले असून हिंदू राष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोहन भागवत यांनी राष्ट्रपती होणे गरजेचे आहे असे ठाकरेंनी म्हटले आहे.

मोहन भागवतांनी खुद्द राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर  शरद पवार राष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा जोर धरु लागली. यापार्श्वभूमीवर शिवसेना मराठीच्या मुद्द्यावर शरद पवारांना पाठींबा दर्शवणार का? असा प्रश्न  ठाकरे यांना विचारण्यांत आला होता. ‘आरएसएस’चे अनेक पदाधिकारी भाजप शासित राज्यात राज्यपाल आहेत. मग मोहन भागवतांनी राष्ट्रपती व्हायला काय हरकत आहे. असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे शरद पवार राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत नाहीत, असे राष्ट्रवादी काँग्रेसनेही यापूर्वी स्पष्ट केले आहे.
विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुदत जुलैमध्ये संपत आहे. त्यामुळे जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला राष्ट्रपतीपदाची निवडणूक होईल. देशातील सर्व खासदार व आमदार या निवडणुकीत मतदान करू शकतात. विधान परिषदेच्या आमदारांना मतदानाचा अधिकार नसतो. लोकसभा व राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या खासदारांना मतदानाचा अधिकार असतो. या निवडणुकीमध्ये शिवसेनेची भूमिका महत्वपूर्ण असणार आहे.