दीक्षान्त समारंभात उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांचे आश्वासन औरंगाबाद: राज्यातील विद्यापीठे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबतचा शासन निर्णय येत्या आठ दिवसांत काढण्यात येणार असून शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मराठीतून शिक्षण देण्याचा निर्णयही प्रस्तावित असल्याचे राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी सांगितले. डॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने दूरचित्रसंवाद्वारे आयोजित दीक्षान्त समारंभात ते बोलत होते. कुलपती व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विद्यापीठातील पदवीधर, पदव्युत्तर आणि विद्यावाचस्पती मिळविणाऱ्यांना पदवी प्रदान केली. या कार्यक्रमात विद्यापीठातील रिक्त पदांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींचा ऊहापोह कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी केला होता. त्यावरून भरतीचे अध्यादेश निघणार असल्याचे उच्च शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. या वेळी नवीन शैक्षणिक धोरणात उच्च व तंत्रशिक्षण तसेच वैद्यकीय व व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण मातृभाषेतून देण्याचा निर्णय देशाच्या प्रगतीसाठी क्रांतिकारक ठरेल, असा विश्वास अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे अध्यक्ष व शिक्षणतज्ज्ञ डॉ.अनिल सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केला. देशात पाच प्रादेशिक भाषेत १४ तंत्रशिक्षण संस्थांमध्ये या वर्षीपासून हा प्रयोग केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दीक्षान्त समारंभाचे सहस्रबुद्धे हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. नवीन शैक्षणिक धोरण २०२० हे विद्यार्थी केंद्रित असून देशाचा शैक्षणिक पाया बळकट करणारे असल्याचा दावा त्यांनी केला. या पूर्वी काळापासून भारतात प्रादेशिक व स्थानिक भाषेतून प्राथमिक शिक्षणाला महत्त्व देण्यात आले आहे. आता नव्या धोरणात ज्ञानव्यवस्था, आंतर विद्याशाखीय दृष्टिकोन व नवोन्मेष आदींना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे आमूलाग्र बदल होतील असेही ते म्हणाले. मराठी, हिंदी, तामिळ, तेलगू व बंगाली या पाच भाषांमधून १४ तंत्रशिक्षण संस्थेत व्यावसायिक शिक्षण यंदापासून सुरू होत असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी संशोधकांच्या पीएच.डीचे वितरण प्रत्यक्ष न घेता दूरचित्रसंवाद पद्धतीने नाववाचन करण्यात आले. या समारंभात ४२२ संशोधकांना पीएच.डी प्रदान करण्यात आली. यामध्ये कला व सामाजिकशास्त्रे-१७४, विज्ञान व तंत्रज्ञान-१२७, वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र-५८ तसेच आंतरविद्या शाखेच्या-६३ संशोधकांचा समावेश आहे. या कार्यक्रमात एकूण ८१ हजार ७३६ पदवीधारकांना पदवी प्रदान करण्यात आले. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान-३८ हजार ५४१, मानव्यविद्या-२० हजार ३९२, वाणिज्य शास्त्र-१७ हजार ५९३, आंतरविद्या शाखेच्या ४ हजार २१० जणांचा समावेश आहे. प्रारंभी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी विद्यापीठाचा प्रगतीचा अहवाल सादर केला. ‘एनआयआरएफ’ रँकिंगमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास ६९ वे स्थान मिळाल्याने पहिल्या शंभरमध्ये स्थान मिळणारे महाराष्ट्रातील हे दुसरे विद्यापीठ ठरले. गेल्या दीड वर्षांत उद्भवलेल्या या संकटामध्ये विद्यापीठांनी सामाजिक बांधिलकीतून अनेक उपक्रम राबविले. दोन करोना चाचणी प्रयोगशाळा उभारणारे हे विद्यापीठ असल्याचे सांगण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुकुल पद्धतीपासून ते उच्च शिक्षण क्षेत्रात झालेले बदल याचा आढावा आपल्या भाषणात घेतला.