औरंगाबाद शहरात जळीतकांड सुरूच असून शहरातील बेगमपुरा, जुनाबाजार, भडकलगेट नंतर मंगळवारी पहाटे जिन्सी भागात वाहने जळल्याची घटना समोर आली आहे. जिन्सी भागात रस्त्याच्या कडेला उभा असलेली पाच माल वाहतूक वाहने जळून खाक झाली. रस्त्यावर उभ्या असलेल्या या वाहनांना आग लावली की लागली हे अद्याप समोर आलेले नाही. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.

शहराच्या जिन्सी परिसरात मोकळ्या मैदानात वाहने उभी केली जातात. त्या ठिकाणापासून काही अंतरावर पोलीस स्थानक देखील आहे. त्या ठिकाणी ही घटना घडली. घटनास्थळी कचरा साचलेला असतो. त्यामुळे आग लागली असावी, असा अंदाज देखील वर्तवला जात आहे. मात्र, शहरातील या अगोदरच्या घटनांची पार्श्वभूमी लक्षात घेता आग लावल्याची शक्यता नाकारता येत नाही. पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत मालवाहतूक वाहने पेटल्याने मोठा भडका उडाला. त्यानंतर अग्निशमन दलाला याबाबत माहिती देण्यात आली. जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अर्ध्या तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. मात्र, आग नेमकी कशामुळं लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नसून घटनेची नोंद जिन्सी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.