महाविद्यालयाचा हीरक महोत्सवी वर्षांनिमित्त संकल्प औरंगाबाद : उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाने २२ जून रोजी हीरक महोत्सवी वर्षांत पदार्पण केले असून संस्थेच्या पूर्वसुरींनी केलेल्या लोकहितैषी कार्याचा वसा यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आलेल्या बैठकीत झाला आहे. खेडय़ांमध्ये जाऊन शेतीसह सामाजिक, धार्मिक सलोखा राखण्यासह राष्ट्रबांधणीच्या नव्या कामाचा संकल्प बैठकीत करण्यात आल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, सचिव माजी आमदार मनोहरराव पटवारी, प्रभारी प्राचार्य आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य राजकुमार म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. या वेळी प्रा. डॉ. मल्ले जुंगा स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या वर्षभरात घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी समिती स्थापन करण्यात आली. येत्या वर्षभरात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांबद्दल उपप्राचार्य म्हस्के यांनी सांगितले की, महाविद्यालयाला सामाजिक क्षेत्रात काम केलेल्या विचारवंतांची परंपरा आहे. यापूर्वी खेडय़ांमध्ये जाऊन ‘संवाद शेतक ऱ्यांशी’ हा महाविद्यालयाकडून उपक्रम राबवण्यात आलेला आहे. यातून शेतक ऱ्यांना शेतीशी संबंधित विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. तद्वतच आता शेतकरी, सामाजिक, धार्मिक सलोखा राखण्यासाठी राष्ट्रबांधणीचे काम करण्यात येणार आहे. महाविद्यालयाने अनेक दुर्मीळ वनौषधींचे जतन केले आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना जून १९६२ रोजी झाली होती. संस्थापक अध्यक्ष म्हणून नथमलसेठ इनाणी यांची निवड करण्यात आली. १२० मुले व १२ मुलींच्या संख्येने उदगीरमध्ये उदयगिरी महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. पहिले प्राचार्य म्हणून १९६२ साली डॉ. ना. य. डोळे यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. डोळे यांनी मोफत शिक्षण आणि बारावीला प्रथम श्रेणीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा दहा रुपये शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला. शिवाय गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना महाविद्यालय परिसरातच रोजगार निर्माण करून दिला. डॉ. डोळे यांनी २८ वर्षे प्राचार्य पदाची धुरा २८ वर्षे सांभाळली. संस्थेने उदगीरच्या मोंढय़ात विक्रीसाठी येणाऱ्या धान्यावर, कापसावर शैक्षणिक कर बसवून निधी जमा करण्याचा निर्धार केला. गोरगरीब, शेतमजूर आणि कष्टकऱ्यांच्या श्रमातून मिळालेल्या या पैशातून ही संस्था उभी राहिली असून २२ जून २०२१ रोजी हीरक महोत्सवी वर्षांत पदार्पण केले आहे. संस्थेचे अध्यक्ष राहिलेले डॉ. शिवराज नाकाडे यांनी पुढे डॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरूपद सांभाळले.