चित्रपटातील गाणी, पक्ष्यांचा आवाज किंवा कर्कश आवाजाच्या मोबाईल रिंगटोन ठेवण्यास पोलीस कर्मचाऱयांना मज्जाव करण्यात आला आहे. चित्रपटातील गाणी किंवा कर्कश आवाजाच्या रिंगटोन ठेवल्याने पोलीस दलाची प्रतिमा मलीन होते, असे सांगत औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या परीक्षेत्रातील पोलीस कर्मचाऱयांना मोबाईलवर सभ्य रिंगटोन ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यासंबंधीचे एक पत्रकच नांगरे पाटील यांनी जारी केले आहे. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱयाने पोलीस दलाची प्रतिष्ठा जोपासली पाहिजे, असेही विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकात नमूद केले आहे. हे पत्रक औरंगाबाद ग्रामीण, बीड, जालना, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली येथील पोलीस अधिक्षकांना धाडण्यात आले आहे.