यावर्षी झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व तालुक्यात शासनाच्या वतीने दुष्काळ जाहिर करण्यात आला आहे. जवळपास सर्वच जलसाठे कोरडे पडल्याने दुष्काळाच्या झळा वाढत आहे. जानेवारीच्या सुरवातीलाच जवळपास ४०५ गावातील नऊ लाख नागरिकांना ५३० टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व तालुक्यात विभष पाणीटंचाई निर्माण होत आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना करण्याच्या सुचना राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला दिलेल्या आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये यासाठीक जीथे टँकरची मागणी असेल त्या गाव वाड्यांना त्वरित टँकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन भर देत आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त दुष्काळाच्या झळा गंगापूर तालुक्यात बसत असून येथील १०४ गावातील १ लाख ८७ हजार ७४८ नागरिकांना १२० टँकरव्दारे पाणीपुरठा करण्यात येत आहे.

वैजापूर तालुक्यातील ७८ गावातील १ लाख ३७ हजार ४२७ नागरिकांना १०७ टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पैठण ७८ गावातील १ लाख ५४ हजार १५३ नागरिकांना ८५ टँकर, सिल्लोड ४६ गावातील १ लाख ४९ हजार १४० नागरिकांना ८८ टँकर, औरंगाबाद ४७ गाव १७ वाड्यांना ७० टँकर, फुलंब्री २० गावांना २९ टँकर, कन्नड २२ गावांना २१ टँकर, खुलताबाद १० गावांना १० टँकर सध्या सुरू आहे. जिल्ह्यात केवळ सोयगांव तालुक्यात एकही टँकर सुरू नाही.