प्रशासनाचे अजब तर्कट

काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचे अंतर वाढण्यामागे दूषित पाणी असल्याचे तर्कट जिल्हा प्रशासनाने मांडले आहे. ज्या गावांमध्ये पिण्याचे पाणी पिण्यायोग्य असल्याचे अहवाल आहेत. त्याच गावातील काहीजणांनी पाणी दूषित असल्याच्या लेखी तक्रारी केल्या होत्या. काळजी घेता यावी म्हणून लांबून टँकर आणले जात असल्याचे तर्कट आता मांडले जात आहे. मात्र, या प्रकरणात चौकशी करण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मान्य केले.

औरंगाबाद जिल्हय़ात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर देताना अधिकचे अंतर दाखवून ठेकेदाराला मदत केली जात आहे काय, याची तपासणी करण्याच्या हालचाली विभागीय आयुक्तालयातून सुरू झाल्यानंतर टँकर भरण्यासाठी आणखी काही ठिकाणे करावीत, अशी सूचना महाराष्ट्र राज्य औद्योगिक मंडळास करण्यात आली आहे. गंगापूर व पैठण या तालुक्यातील बहुतांश टँकर औरंगाबाद शहराजवळील एमआयडीसीच्या पाणीपुरवठा केंद्रातून होतो. त्यांनी आणखी काही ठिकाणी टँकर भरण्याची सोय उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच वैजापूर तालुक्यातील टँकरचे अंतर कमी करण्यासाठी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना नंदगाव तालुक्यातून पाणी देण्याची विनंती केली असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले.

‘टँकर आवडे सर्वाना’ शीर्षकाखाली ‘लोकसत्ता’ मध्ये टँकरच्या अंतराच्या अनुषंगाने वृत्त प्रकाशित झाल्यांनतर विभागीय आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनीही आता टँकरचे अंतर योग्य आहे का, याची तपासणी करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. काही गावांमध्ये पाणी दूषित येत असल्याचे सांगत टँकरचा फेरा वाढविण्यात आला होता. विशेषत: पैठण तालुक्यात तसेच जालना जिल्हय़ातही टँकरचे अंतर लांब दाखवून पाणी आणले जात असल्याच्या नोंदी घेण्यात आल्या होत्या. ज्या गावांमध्ये पाणी दूषित असल्याचे सांगून टँकरचा फेरा वाढविण्यात आला त्या गावांभोवतीचे पाण्याचे नमूने पाणी पिण्यास योग्य असल्याचे आढळून आले आहेत. मात्र, काही नागरिकांनी दूषित पाणी येत असल्याची लेखी तक्रार केल्याने टँकरचा फेरा वाढविण्यात आल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात चौकशी करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

सध्या राज्यात सर्वाधिक ५५० हून अधिक टँकर एकटय़ा औरंगाबाद जिल्हय़ात आहेत. वाळुज औद्योगिक वसाहतीमधून होणारा टँकरचा पाणीपुरवठा आणखी एका ठिकाणाहून करता येऊ शकेल काय, याची चाचपणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. वैजापूर तालुक्यातील टँकरला नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी देण्यास मान्यता दिली तर २४ किलोमीटरचे अंतर वाचणार असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.

पैठण तालुक्यातील मिरखेडा (९२ कि.मी.), रांजणगाव-दांडगा (९० कि.मी.), सोनेवाडी (१२४ कि.मी.), सानपवाडी (९८कि.मी.), कोळीबोडखा (९६ कि.मी.), चौढाळा (९२ कि.मी.), कडेठाण तांडा (९२ कि.मी.) असे टँकरचे किलोमीटर आहेत. मात्र, काही गावातील मंडळींनी पाणी दूषित असल्याचे लेखी कळविल्याने काळजी म्हणून लांबून पाणी आणले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान टँकरने पाणीपुरवठा होताना वाढलेल्या अंतराच्या चौकशी करावी लागेल, असे आता वरिष्ठ अधिकारीही सांगू लागले आहेत.