औरंगाबाद- कन्नड तालुक्यातील आडगाव जेहूर परिसरात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर सायंकाळी खारी नदीला आलेल्या पुरात बैलगाडीमधील आठ जण वाहून गेले. यातील पाच जण बचावले. तर एक महिला व दोन मुलींचा मृत्यू झाला. साक्षी अनिल सोनवणे (वय १६), पूजा दिनकर सोनवणे (१२) मीनाबाई दिनकर बहीरव (५० सर्व रा आडगाव) यांच्यापैकी दोन जणींचे मृतदेह नागरिकांना झाडांला लटकलेले आढळून आले असून एक जणीचा शोध रात्रीपर्यंत सुरू होता. दोन्ही मृतदेह नांदगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. या घटनेत ज्योती वाल्मिक सोनवणे (३५), समीक्षा अनिल सोनवणे (१४), उषा दिनकर सोनवणे (३०), पूजा विकास बहिरव, विकास दिलीप बहिरव हे बचावले. मृत व वाहून गेलेल्यांना ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर आले. बैलगाडीतील आठ जण वाहून गेल्याची वार्ता पंचक्रोशित वाऱ्यासारखी पसरली. ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते.