औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण विधानसभा मतदारसंघातील बिडकीनमध्ये शिवसंवाद यात्रेच्या सातव्या टप्प्यात शिवसेना नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी आज झंझावाती सभा झाली. गद्दार गँगच्या पालकमंत्री यांनी धुमाकूळ घातला असताना येथील स्थानिक जनतेने शिवसेनेवर विश्वास दाखवत सरपंच आणि पंचायत समितीला विजय मिळवून दिला. यावरून येथील जनतेने गद्दारांना नाकारल्याचे चित्र स्पष्ट झाले, त्याबाबत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पैठणच्या जनतेचे आभार मानले. तसेच संविधानावर आमचा पूर्ण विश्वास आहे. न्याय आपल्या बाजूनेच होणार फक्त दोन-तीन महिने थांबा आणि आज ना उद्या हे ४० गद्दार राजकारणातून हद्दपार होणारच, असे आदित्य ठाकरे यांनी म्हणताच उपस्थितांमधून ५० खोके एकदम ओके, अशा घोषणा देण्यात आल्या. गद्दारांचे डिपॉझिट जप्त करणार, अशाही घोषणा यावेळी देण्यात आल्या. शेतात दोन हॅलिपॅड असणारा शेतकरी मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, "एकीकडे घाम गाळणारा शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित आहे तर दुसरीकडे राज्यात एकमेव शेतकरी ज्यांच्या शेतात दोन हेलिपॅड उतरतात ते म्हणजे मंत्रालायत बसणारे मुख्यमंत्री. "सत्तामेव जयते'ला महत्त्व नाही तर 'सत्यमेव जयते'ला शिवसेना महत्त्व देते. कृषी आणि उद्योग हे डबल इंजिन आपल्याकडे आहे. "ओला दुष्काळ जाहीर करा, नाही तर खुर्च्या खाली करा", या आमच्या मागणीनंतरही सत्ताधारी हे खुर्च्यांना चिकटून राहिले आहेत. त्यामुळे त्यांना ओला दुष्काळ दिसला नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. तर मविआ सरकारच्या काळात मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे असताना कोणत्याही जाचक अटींशिवाय सरसकट मदत ही शेतकऱ्यांना देण्यात आली होती याची एकदा आठवण आदित्य ठाकरे यांनी शेतकरी बांधवांना करून दिली. हे वाचा >> “आमच्या पाठीत खंजीर खुपसला तरी…”, एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरेंच्या शुभेच्छा; म्हणाले, “आज आव्हान…” आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, ज्या सुरतमध्ये गद्दार लपून बसले होते, त्या सुरत आमि गुजरात सरकारचे आभार मानायला यांनी येथील उद्योगधंदे पळवले. युवकांचा रोजगार आणि शेतकऱ्यांची नुकसान भरपाई खोके गँगने हिरावली आहे. खोके गँग ही महाराष्ट्रद्वेषी आहे, टक्केवारीत अडकली आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. पैठण शहरात लावलेले स्पीड ब्रेकर आपलं सरकार आल्यावर सपाट करून टाकू आणि महाराष्ट्राची विकासकामे गतिमान करू. निवडणुका लागतील तेव्हा संपूर्ण वातावरण भगवेमय होणार असल्याचा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.