२०२४ साली लोकसभा आणि महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपाकडून लोकसभा मिशन ४५ आणि विधानसभा मिशन १४५ साठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची चंद्रपूर आणि औरंगाबादमध्ये सभा पार पडली. पण, जे.पी.नड्डा यांचं भाषण सुरु होण्यापूर्वीच महिला सभेतून उठून गेल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यावरून विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपाला टोला लगावला आहे. औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कतिक मंडळाच्या मैदानावर जे.पी.नड्डा यांची सभा पार पडली. या सभेत केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांचं भाषण सुरु असताता महिला उठून गेल्या. हाच व्हिडीओ अंबादास दानवे यांनी ट्वीट करत भाजपाला लक्ष्य केलं आहे. हेही वाचा : अजित पवारांनी संभाजीराजेंचा ‘धर्मवीर’ उल्लेख केल्यानंतर शिवसेनेने ‘सामना’तून मांडली भूमिका, म्हणाले “अण्णाजी पंतांचे समर्थक…” "अहो अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, जरूर पाहा हा खड्डा.. लोक आपले भाषण सुरू होण्यापूर्वीच खुर्च्या सोडून गेले. संभाजीनगर फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहे. हे आज तुमच्याच साक्षीने जनतेने अधोरेखित करून टाकले आहे," असं अंबादास दानवेंनी म्हटलं आहे. तसेच, जे.पी. नड्डा यांनी भाषणात बोलताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख बाळासाहेब देवरस असा केला. यावरूनही अंबादास दानवेंनी टीका केली आहे. ट्वीट करत दानवे म्हणाले, "नड्डाजी, यापुढे महाराष्ट्रात येताना ‘बाळासाहेब ठाकरे’ हे नाव पाठ करून या. आज सभेत आपण त्यांचा ‘बाळासाहेब देवरस’ असा उल्लेख केला. जे बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख धड करू शकत नाहीत, ते त्यांच्या धगधगत्या विचारांचा वारसा काय सांभाळणार!," असं अंबादास दानवेंनी सांगितलं. हेही वाचा : “नंगटपणा हा…”, अमृता फडणवीसांचा स्विमिंग पूलमधील फोटो शेअर करत अंधारेंचा चित्रा वाघ यांना सवाल "उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला" चंद्रपुरातील सभेत अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. "शौर्य व विरतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी केवळ मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला. महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव सेना, काँग्रेस व राष्ट्रवादी अशी भ्रष्टाचाराची तीन दुकाने उघडली. सत्तेसाठी विचारांशी तडजोड करणाऱ्या अशा लोकांना माफी नाही. राजकारणात सत्याचा नेहमीच विजय होतो. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस समोर माथा टेकता टेकता ठाकरे यांचा माथाच झुकला आहे," असं जे.पी. नड्डा म्हणाले.