औरंगाबाद: महापालिकेवर व्याजासह असणारे २९२ कोटी रुपयांचे कर्ज फिटले असून ती पूर्णत: कर्जमुक्त झाली असल्याचा दावा प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी केला आहे. वर्षअखेरी ९७ कोटी ७८ लाख रुपयांची वसुली झाली असून गेल्या २०१६ पासूनची ती सर्वाधिक असल्याचेही ते म्हणाले. चुकीचे मालमत्ता कर दुरुस्त करणे, थकबाकीवर ७५ टक्के सवलत अशा योजनांमुळे वसुली वाढल्याचे त्यांनी सांगितले. गेली अनेक वर्ष प्रामुख्याने शिवसेनेची सत्ता असताना महापालिकेची आर्थिक स्थिती दयनीय होती. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी या प्रकरणी लक्ष घातल्यानंतर आता आर्थिक बाजू स्थिरावत असल्याचा दावा त्यांनी केला. गेली अनेक वर्षे महापालिकेच्या विकास कामांकडे कंत्राटदार फिरकत नव्हते. निविदा भरण्यासही कोणी इच्छुक नसत. मात्र, आता परिस्थिती बदलत असून १०१९ पासून ३८६ कोटी रुपयांच्या थकबाकीपोटी ३२० कोटी रुपयांच्या रकमा परत करण्यात आल्या असून उर्वरित देणीही मार्चपर्यंत दिली जातील असेही प्रशासक पांडेय यांनी सांगितले. डिसेंबर अखेर २०१६ पासूनची आकडेवारी त्यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत सांगितली. २०१६ मध्ये ६६ कोटी ९६ लाख, त्या पुढील वर्षांत ६४ कोटी वसुली झाली होती. महापौर व पदाधिकारी यांचा कारभार असताना वसुलीचे आकडे कमी होते. मात्र प्रशासक म्हणून काम करताना वसुलीची कार्यपद्धती अधिक सुसूत्रतेने करण्यात आली. प्रत्येक कर्मचाऱ्याला दीड हजार मालमत्तांची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे एकच पथक एकाच घरात वारंवार जाण्याची प्रक्रिया टळली. देयके वाटप नीट झाल्याने वसुली वाढल्याचे सांगण्यात आले. चार वर्षांतील विक्रमी वसुलीचा हा आकडा कोविड काळातील आहे. औरंगाबाद शहरातील पाणी पुरवठा योजनेसाठी मोठे कर्ज घेण्यात आले होते. ही रक्कम परत करणे अवघड होऊन बसले होते. कर्जापोटी महापालिकेने काही मालमत्ताही गहाण ठेवल्या होत्या. कर्जमुक्तीनंतर त्यावरील बोजा कमी होणार आहे. दरम्यान रस्ते, घनकचरा व्यवस्थापनातही सुधारणा होत असून बहुतांश रस्ते पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात आले.