जिल्हाधिकाऱ्यांच्या अनाकलनीय निर्णयाने शेतकरी संतापले बिपीन देशपांडे औरंगाबाद : शहरांमध्ये होणाऱ्या हौसमौजेला नजीकच्या खेडय़ांकडे वळवत हुरडा उत्पादन आणि त्याकडे व्यावसायिक अंगाने पाहणारी एक व्यवस्था आकाराला घेऊ पाहत असतानाच करोनाच्या वाढत्या संसर्गाचे कारण देत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध लादले. बिअरबार सुरू, शहरी भागातील बाजारपेठा सुरू आणि हुरडय़ावरच संक्रांत कशासाठी, असा सवाल आता केला जात आहे. या निर्णयामुळे चार ते पाच कोटी रुपयांच्या उलाढालीला फटका बसणार आहे. कोंदट जागेत चालणारी दारूची दुकाने, हॉटेल, बीअरबार यामुळे करोना संसर्ग वाढतो की नैसर्गिक वातावरण व शारीरिक अंतराचे नियम सहजपणे पाळता येतील अशा शेतशिवारात, असा प्रश्न उपस्थित करत हुरडा पाटर्य़ावरील निर्बंध अनाकलनीय असल्याची प्रतिक्रिया शेतकरी, व्यावसायिकांमधून उमटते आहे. गंगापूर तालुक्यातील नरसापूर हे औरंगाबादपासून २५ किलोमीटरवरील साधारण पाचशे ते सहाशे लोकवस्तीचे गाव आहे. या गावचे संपूर्ण अर्थकारण उत्पादित हुरडा पिकावर आहे. येथील हुरडा औरंगाबाद, पुणे, मुंबईसह अवघ्या महाराष्ट्राला पुरवण्यात येतो. नरसापूरचे ग्रामस्थ तथा हुरडा व्यावसायिक सुनील शिंदे यांच्या मते गावात सुमारे सातशे एकरवर सुरती व गूळभेंडी, अशा वाणांच्या हुरडय़ाची लागवड होते. यातून एक ते दोन कोटींचा व्यवसाय हा जानेवारी व फेब्रुवारीच्या महिन्यातच होतो. एकरी चार ते पाच क्विंटल एवढा हुरडा निघतो. आता हुरडा पाटर्य़ावर निर्बंध लादल्यामुळे व्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे. विशेष म्हणजे या हुरडय़ातून पुढे ज्वारी वगैरे पीक घेता येते, हा समज आहे. खास बीज पेरूनच हुरडा उत्पादन काढले जाते. त्याचा पुरवठा हुरडा पाटर्य़ा आयोजित करणाऱ्या व्यावसायिकांकडे केला जातो. त्यातूनही अर्थार्जन होते. हुरडा पाटर्य़ामधून ग्रामीण भागातील अर्थकारणालाही चालना देण्याचा विचार अलिकडे रुजू लागला आहे. पेरू, पपई, मोसंबी, लसूण, मका, बोरं, अशा रानमेव्याला खरेदीदार हुरडा पाटर्य़ाच्या निमित्ताने मिळू लागले आहेत. पाटर्य़ाचा आनंद घेतल्यानंतर शहरी खवय्ये फळंही खरेदी करून घेऊन जातात. यातून काही प्रमाणात शेतकऱ्यांची शहरांमधील वारी टळते आणि त्याला स्थानिक पातळीवरच चार पैसे हातात मिळतात. या संदर्भात किरकीन येथील हुरडा पार्टी आयोजनातील व्यावसायिक प्रशांत जोशी यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील नागरिकांना हुरडा भाजून देण्याच्या कामासह इतरही बाबीतून रोजगाराची संधी मिळते आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष, अशा दोनशे जणांना एका व्यावसायिकाच्या माध्यमातून रोजगार मिळतो. औरंगाबाद ते पैठण रोडवरच साधारण दहा ठिकाणी हुरडा पाटर्य़ाचा व्यवसाय चालतो. त्यामध्ये पैठण, ढोरकिण-किरकीनसह अनेक गावे आहेत. खुलताबाद आदी ठिकाणांसह औरंगाबाद शहर परिसरात अनेक व्यावसायिक असून नव्या निर्बंधांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार आहे. अलिकडेच गारपीट झाली. त्याचा फटका पैठण तालुक्यातील अनेक गावांना बसला. आता करोनाच्या पार्श्वभूमीवर हुरड पाटर्य़ावरील निर्बंधांमुळे शेतकरी कोलमडणार आहे. हुरडा पाटर्य़ासाठी विशिष्ठ प्रकारच्या सुरती, गूळभेंडी वाणाची लागवड केली जाते. साधारण दोन ते तीन हजार रुपये किलोचे हे बियाणे असते. त्यातून पुन्हा ज्वारीचे उत्पादन होते, असे मानणे गैर आहे. औरंगाबाद जिल्ह्यात साधारण एक हजार एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर हुरडय़ाची लागवड झालेली आहे. या सर्वाचा व्यवसाय आता अडचणीत आला असून जानेवारी ते फेब्रुवारी, असे दोनच महिने हुरडा विक्रीतून शेतकऱ्यांच्या हाती चार पैसे येतात. बीअरबारची दुकाने, हॉटेल हे सर्व सुरू ठेवून हुरडा पाटर्य़ावर निर्बंधांसारखा निर्णय घेतला त्याचे आश्चर्य वाटते. खरे तर हुरडा पाटर्य़ाच्या ठिकाणी गर्दी नसते. खुली-खेळती हवा असते. शारीरिक अंतर राखण्यास भरपूर जागाही असते. ग्रामीण भागातील व्यक्तीला रोजगार मिळतो. रानमेवा विक्री, घोडागाडी, बैलगाडी यातील रपेट, फेरफटका मारण्याच्या हौशेतून चार पैसे ग्रामीण भागातील व्यक्तीच्या हाती येतात. या र्निबधामुळे हा सारा व्यवहार ठप्प होणार आहे. औरंगाबादेत अनेक प्रदर्शन, कार्यक्रमात गर्दी होताना दिसते. मात्र, त्यावर काहीच बंधने लावली जात नाही. निर्बंध सरसकट करावेत. आम्ही आता बैठक घेऊन एक-दोन दिवसात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत. - दिलीप भालेकर, खारकिण