छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील दुष्काळ हटवू, असा संकल्प केला होता. समुद्रात वाहून जाणारे ५० अब्ज घनफूट पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी विविध योजना तयार केल्या जात आहेत. त्याचे सविस्तर प्रकल्प अहवाल येत्या सहा महिन्यांत होतील. याशिवाय कोल्हापूर – सांगली जिल्ह्यात येणाऱ्या पुराचे पाणी उजनी जलाशयाच्या माध्यमातून मराठवाड्यात आणण्यासाठी मे महिन्यात निविदा काढण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ‘सीएमआयए’ या औद्योगिक संघटनेच्या वतीने आदर्श उद्योजकता पुरस्कार प्रसंगी त्यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी सुरू असणाऱ्या विविध संकल्पांची माहिती उपस्थितांना दिली.
‘सांगली-सातारा सर्वाधिक पाणी शिरले तो आकडा १७० अब्ज घनफुटाचा (टीएमसी) एवढा होता. एरवी देखील सरासरी ८० टीएमसी पाणी या भागातून वाहून जाते. यातील ३० ते ३५ टीएमसी पाणी मराठवाड्यास मिळू शकते. उजनी धरणाच्या माध्यमातून ही याेजना केली जाणार आहे. २०१९ मध्ये पूर आला होता, तेव्हा जागतिक बँक प्रतिनिधी आणि तज्ज्ञांशी चर्चा केली होती. आता या योजनेला मूर्त रूप दिले जातील,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मराठवाड्यातील तुटीच्या खोऱ्यात पाणी आणण्यासाठी कट्टीबद्ध असल्याच्या आश्वासनाचा फडणवीस यांनी पुनरुचार केला.
जायकवाडीवर तरंगत्या सौरपटलातून वीज निर्मितीस चालना
जायकवाडी धरणावर तरंगत्या सौरपटलातून वीज निर्मितीच्या प्रकल्पासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळविल्या जातील. अलीकडेच वन्यजीव विभागाने या प्रकल्पास मान्यता दिली आहे. मात्र, अजूनही वन विभागाची परवानगी मिळणे बाकी आहे. हा प्रकल्प व्हावा म्हणून खासदार डॉ. भागवत कराड यांनी केलेल्या पाठपुराव्याचेही त्यांनी कौतुक केले. स्वच्छ ऊर्जा मिळविण्याच्या या प्रकल्पाचे बरेच टप्पे पार केले आहेत. त्यामुळे तरंगत्या सौर पटलापासून वीज निर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित केला जाईल, असे फडणवीस म्हणाले.
कराड यांना पुन्हा खासदार करा – उद्योजकांची मागणी
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून होणाऱ्या विकासकामांना लागणारे पाठबळ मिळविण्यासाठी राज्यसभेत एक खासदार असणे आवश्यक आहे. गेल्या वेळी खासदार कराड यांना मंत्रिपद मिळाल्याने केंद्रीय पातळीवर विविध योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी मदत झाली. त्यामुळे पुढील काळातही डॉ. खासदार यांना खासदार करावे, अशी मागणी या वेळी उद्योजक राम भोगले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर केली.