औरंगाबाद: औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी औरंगाबाद नामांतर विरोधी कृती समितीच्या पुढाकाराने मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. पावसाळी वातावरणामुळे तुलनेने कमी गर्दी असलेल्या मोर्चात ‘आम्ही औरंगाबादी’, ‘औरंगाबाद जिंदाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या. नामांतर विरोधाची लढाई दोन्ही पातळय़ांवर लढली जाईल, असे या वेळी खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले. चांगला-वाईट कसाही इतिहास असला तरी तो इतिहास आहे तो बदलू देणार नाही, असे सांगत कॉग्रेस नेत्यांवर टीका केली. अशोक चव्हाण व बाळासाहेब थोरात यांच्यावरही त्यांनी टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भडकल गेट येथील पुतळयापासून मोर्चास सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला जाहीर करण्यात आलेल्या मूक मोर्चामध्ये तरुणांनी घोषणाबाजी केली. हातात तिरंगा घेत तरुण या मोर्चात सहभागी झाले होते. औरंगाबाद जिंदाबादच्या घोषणा देत आमखास मैदानावर विविध पक्षातील कार्यकर्त्यांची भाषणे झाली. जाता जाता उद्धव ठाकरे सरकारने घेतलेला निर्णयच मुळात अवैध व अल्पमतातील सरकारने घेतला आहे. तो न्यायालयात टिकणार नाही, असे या वेळी कार्यकर्त्यांना सांगण्यात आले. मंगळवारी दिवसभर पावसाळी वातावरण असल्याने मोर्चात केवळ तरुणांची संख्या अधिक दिसून आली. मोर्चासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. टीकेचा रोख काँग्रेसवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत नामांतराचा प्रस्ताव येणार याची पुरेशी माहिती असतानाही काँग्रेसने विरोध केला नाही. किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता असे कॉग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात सांगत होते. मग, ते का शांत बसले, असा टीकाही खासदार इम्तियाज जलील यांनी केली. मुंबईत बसून घेतलेले सर्व निर्णय औरंगाबादकर मान्य करतील असे नाही. संभाजी महाराजांविषयी त्यांना प्रेम नाही. त्यांना मतपेढीचे राजकारण करायचे आहे. पण कॉग्रेसच्या नेत्यांनी विरोध केला नाही. त्यातही अशोक चव्हाण यांच्यावर जलील यांनी टीका केली.