औरंगाबाद : सरकार मार्चपर्यंत पडेल की नाही हे सांगता येणार नाही. पण आता आम्ही विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याचे ठरविले असून सरकार पडेल तेव्हा पडेल, आम्ही काम करू. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री असल्याने त्यांच्या वक्तव्यावर बोलता येणार नाही. हे सरकार पाडण्याचे कोणतेही प्रयत्न सुरू नाहीत, असे गिरीश महाजन यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. राज्य सरकार असंवेदनशील असल्याची टीका करत महाजन म्हणाले,की राज्यातील पाटबंधारे विभागांतर्गत एकही काम सुरू नाही. फडणवीस सरकारच्या काळात ९० टक्के कामे पूर्ण झाली होती. पण पाच टक्के काम पूर्ण होत नसल्याने शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचू शकलेले नाही. वीज वसुली जुलमीपद्धतीने सुरू आहे. सरकार नीट काम करत नाही. पण सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका नीटपणे बजावत असल्याचा दावा त्यांना केला. विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून पुन्हा एकदा दगा झाल्याचा आरोपही त्यांनी केला. चर्चेच्या तीन फेऱ्यांनंतर अनेकांना आम्ही जातीयवादी असल्याचा निष्कर्ष काढावासा वाटतो, हे चुकीचे असल्याचे महाजन म्हणाले.