औरंगाबाद – येत्या २५ ऑक्टोबर रोजी सूर्यास्तावेळी खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याची संधी ७० वर्षांनंतर चालून आली आहे. एकीकडे महाप्रकाशाचा सण दिवाळीचा काळ असून घरे दिव्यांनी उजळलेली तर दुसरीकडे आकाशात सूर्यग्रहणाची सुंदर रोषणाई पहायला मिळणार असल्याची माहिती येथील एमजीएमच्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले. आश्विन अमावास्येच्या दिवशी खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार असून ते भारतासह आशिया खंडाचा पश्चिम व मध्य भाग, संपूर्ण यूरोप आणि आफ्रिका खंडाच्या काही भागातून पहायला मिळणार आहे. हे सूर्यग्रहण ग्रहणचक्र (सॅरोस) १२४ क्रमांकाचे आहे.
मराठवाड्यातील शहरांच्या वेळा पाहिल्यास औरंगाबाद येथून सायंकाळी ४.५० वाजता सूर्यग्रहणास स्पर्श होईल. ग्रहण मध्य सायंकाळी ५-४२ वाजता होईल. त्यावेळी चंद्रबिंब सूर्यबिंबाचा ३६ टक्के भाग झाकून टाकील. पश्चिम आकाशात सूर्यास्तावेळी हे सुंदर दृश्य पाहता येईल. नंतर ग्रहण सुटण्याआधीच सायं. ६-०९ वाजता सूर्यास्त होईल. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात ग्रहणातच सूर्यास्त होताना दिसेल. खगोल व हौशी छायाचित्रकारांना ही एक पर्वणीच असेल. मराठवाड्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून सूर्यग्रहण दिसेल.




शहर. स्पर्श वेळ मध्य. सूर्यास्त
औरंगाबाद ४:५०… ५:४२….५:५९
जालना…. ४:४९….. ५:४२…..५:५६
बीड….. ४:५२ …. ५:४३…..५:५७
उस्मानाबाद ४:५४.. ५:४४….५:५७
परभणी…..४:५२…..५:४३…..५:५३
नांदेड…….४:५३…..५:४३…..५:५१
लातुर….. ४:५४…..५:४४…..५:५४
हिंगोली… ४:५१…..५:४२…..५:५१
ग्रहण ग्रसण्याची टक्केवारी ही सर्वात कमी उस्मानाबाद येथे ३३ टक्के तर सर्वात जास्त जालना येथे ३७ टक्के असणार आहे. सूर्यग्रहण हे साध्या डोळ्यांनी पाहू नये. पाहिल्यास दृष्टीस इजा होते. सूर्यग्रहण हे ग्रहण चष्म्यातूनच पहावे किंवा चाळणीतून सूर्याची प्रतिमा कागदावर घेऊन त्यामध्ये पहावे. एमजीएममध्ये विशेष ग्रहण चष्मेही असल्याचे औंधकर यांनी सांगितले.
पाठोपाठ चंद्रग्रहणही दिसणार
खंडग्रास सूर्यग्रहणानंतर १४ दिवसांनी मंगळवार, ८ नोव्हेंबर रोजी होणारे चंद्रग्रहणही भारतातून दिसणार आहे. त्या दिवशी ग्रहणातच चंद्र उगवताना दिसणार आहे. यावर्षी दीपावलीमध्ये जरी सूर्यग्रहण येत असले तरी २५ ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहणाच्या दिवशी कोणताही सण नाही. यामुळेच सूर्यग्रहण पाहण्याची नामी संधी मिळणार आहे. करोना संकटाच्या दोन वर्षानंतर हा दीपावलीचा सण पृथ्वीवर आणि आकाशात मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
आगामी दहा वर्षांपर्यंत सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळणार नाही
आगामी दहा वर्षांत भारतातून दोन सूर्यग्रहण दिसणार आहेत यातील ०२ ऑगस्ट २०२७ रोजी दिसणार्या खंडग्रास सूर्यग्रहणा दिवशी पाऊस पडण्याचा अंदाज आहे त्यामुळे हे ग्रहण दिसण्याची शक्यता कमीच आहे तर २१ मे २०३१ रोजी रामेश्वरम मधुन कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार असून आपल्या मराठवाड्यात ते खंडग्रास स्थितीत पहायला मिळणार आहे. त्यामुळे यावर्षी खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याची मिळालेली संधी चुकवु नये, असे आवाहनही श्रीनिवास औंधकर यांनी केलेले आहे.
औरंगाबाद येथे विशेष ग्रहण महोत्सव
या खंडग्रास सूर्यग्रहणानिमित्त नागरिकांमधील असेलेल्या गैरसमजुती/अंधश्रद्धा दुर करुन त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा यासाठी २५ ऑक्टोबर २०२२ रोजी “टेलिस्कोप ओनर्स मीट” चे आयोजन करण्यात आले आहे. यात ज्यांचे कडे स्वतःची दुर्बिण आहे यांनी सहभागी व्हायचे असू या मीट दरम्यान आलेल्या नागरिकांमधील प्रश्नाची उकल करण्यात मदत करावी लागणार आहे. या मीट मध्ये सहभागी होणाऱ्यांनी आपली नावे २० ऑक्टोबर पर्यंत एमजीएम खगोलअंतराळ विज्ञान केंद्राकडे नोंदवावीत, असे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी कळवले.