औरंगाबाद: ५४ हजार हेक्टरवर रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड झाली असून यामध्ये आता ड्रॅगन फ्रुट, शेवगा, केळी व द्राक्षे इत्यादी पिकांचा समावेश करण्यात आला. त्याचबरोबर फळझाडातील अंतराची अट शिथिल केल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत झाली असल्याचा दावा रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांनी केला. विभगीय आयुक्तालयात स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कार्यक्रमानंतर शुभेच्छा संदेश देताना त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान मातोश्री शेत पाणंद रस्ते योजनेतूनही राज्यात २५ हजार किलो मीटरच्या रस्त्यांना मान्यता देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. खासदार इम्तियाज जलील, आमदार प्रदीप जैस्वाल, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक नीलेश गटणे, विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम. एम. प्रसन्ना, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता आदींची या वेळी उपस्थिती होती. इको बटालियन व सामाजिक दायित्व निधीच्या मदतीने गोगाबाबा टेकडी हिरवीगार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. २०२१ मध्ये ६६ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले होते. परंतु जिल्ह्याने तब्बल ८५ लाख झाडे लावून त्याचे संगोपन केले. १२७ टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आपला जिल्हा यशस्वी झाला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या आत्मनिर्भरतेसाठी ‘उभारी’ उपक्रमांतर्गत सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून ११९ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना अनेक योजनांचा लाभ देऊन मदत करण्यात आली आहे. अनेक योजनांमध्ये औरंगाबाद जिल्ह्याची कामगिरी सरस असल्याचा दावा त्यांनी केला. क्रीडापटूंना खेळात प्राविण्य मिळविता यावे म्हणून विभागीय क्रीडा संकुलात मराठवाड्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘सिंथेटिक ट्रॅक’ होणार आहे. यामुळे क्रीडा प्रबोधिनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तसेच साईच्या निवासी प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंना सरावाकरिता अतिरिक्त व्यवस्था निर्माण होईल असेही ते म्हणाले. पैठणच्या संतपीठासाठी २३ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केल्याचीही माहिती त्यांनी दिली.