निवृत्तीचा काळ ज्ञानदानाने सुखाचा!

औरंगाबाद : शासकीय सेवेतून निवृत्ती घेतल्यानंतरच्या काळात काय करायचे, असा प्रश्न अनेकांना पडतो. या प्रश्नाचे उत्तर महावितरणमधून कार्यकारी अभियंतापदावरून निवृत्त झालेले अरविंद शहा, ‘आवड असणाऱ्यांनी ज्ञानदानाचे कार्य करावे.’ असे देतात. गरीब घरच्या विद्यार्थ्यांची निशुल्क शिकवणी घेण्यासह तरुण-तरुणींनाही भगवद्गीता, संस्कृत शिकवण्यासारखे काम शहा यांनी स्वीकारले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मूळचे अमरावतीचे व आता औरंगाबादेतील पानदरिबा भागात वास्तव्यास असलेले अरविंद शहा हे २००४ मध्येच महावितरणमधून निवृत्त झाले. अनेक विषयांचा स्वत अभ्यास केला. या ज्ञानाचा उपयोग ज्ञानदानाने करावा, या विचाराने त्यांनी भगवत गीतेचे ऑनलाइन वर्ग सुरू केले. १८ ते २० जणांची एक अशा दोन तुकडय़ांना ते सध्या गीतेचे धडे देतात. याशिवाय भांडी घासणाऱ्या महिलांच्या मुलांकडे ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था नसल्याचे पाहून त्यांचे स्वतंत्र वर्ग घरीच सुरू केले. त्यांच्याकडे शिकणारा चेतन, दर्शन व निशिता ही १० ते १२ वर्षांची मुले सांगतात की, पूर्वी गणित, इंग्रजी विषयाचे फारसे काही येत नव्हते. पण आता  इंग्रजीतील ५०० ते ६०० शब्द मुखोद्गत झाले आहेत. याशिवाय वजाबाकी, भागाकार येऊन दिनदर्शिका, नकाशा कसा पाहावा, त्यातील सांकेतिक रेषा, त्यांचे अर्थही समजायला लागले आहेत. शहा सांगतात की, या लहान मुलांना वैयक्तिक स्वच्छतपासूनचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. ज्ञानदानाचे कोणतेही काम निशुल्क पद्धतीने करतो. त्यात आपल्याला आनंदही येतो. त्यामुळे निवृत्तीचा काळ माझ्यासाठी सुखाचा वाटतो.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Free tuition for poor students from retired executive engineer arvind shah zws
First published on: 14-06-2021 at 01:59 IST