छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक : गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा चाळिशीपार गेला असतानाच सोमवारी राज्याच्या काही भागांत अवकाळी पाऊस झाला. मात्र या पावसाचा शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना मोठा फटका बसला. मराठवाड्यात विविध ठिकाणी वीज पडून तिघांचा मृत्यू झाला. गारपीटीने अनेक जिल्ह्यांत फळपिकांचे मोठे नुकसान झाले, तर नाशिकमध्ये शेतात उघड्यावर असलेला कांदा आणि आंब्याला फटका बसला. विदर्भात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड व जालना जिल्ह्यात अवकाळी व गारांचा पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर तालुक्यातील कोडापूर शिवारात अशोक नंदू मस्के (वय २२ ) यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यातील मगरवाडी येथे सचिन मगर (वय ३८) यांचा, तर वडवणी तालुक्यातील ढोरवाडी येथील अभिमन्यू पांडुरंग नलभे (वय ३६ ) यांचा वीज पडून मृत्यू झाला. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील कोरवाडी येथे गोठ्यावर वीज पडल्याने गाय व वासरू मृत्युमुखी पडले. परतूर तालुक्यातही वीज पडून बैल मृत झाल्याचे वृत्त आहे.

जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे दुपारी साडेतीनच्या सुमारास गारांचा पाऊस झाला. वादळाने अनेक ठिकाणी झाडे कोसळली. जालना आणि बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारांचा मोठा पाऊस झाल्याने फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नांदेडमध्ये वादळी वाऱ्यामुळे दुचाकीचा अपघात झाला आणि दुचाकीस्वराच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर, कन्नड भागांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे तापमानातही घट झाली. छत्रपती संभाजीनगर शहरात मात्र पाऊस झाला नाही. हिंगोलीमध्ये वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस पडून गेला. नांदेडमध्येही दुपारनंतर वादळी वारे सुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला.

नाशिकमध्ये कांदा, आंब्याला फटका

नाशिक : जिल्ह्यात सोमवारी दुपारी नांदगाव आणि मालेगाव तालुक्यांतील काही भागांत अर्धा तास अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. शेतात उघड्यावर असलेला कांदा आणि आंब्यांना याचा फटका बसला. मनमाड शहर आणि परिसरात सुरुवातीला हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू झाला. नंतर मेघ गर्जनेसह वाऱ्याचा आणि पावसाचा वेग वाढला, त्यात १० ते १५ मिनिटे गारपीट झाली. सध्या ग्रामीण भागांत कांदा काढणीचे काम चालू आहे. शेतातून काढलेला कांदा खळ्यात साठवला जातो. अकस्मात आलेल्या पावसाने अनेक ठिकाणी कांदा भिजला. तसेच वादळी पावसामुळे काही ठिकाणी झाडावरील आंबे गळून पडले.

विदर्भात सलग तिसऱ्या दिवशी पाऊस

नागपूरसह विदर्भातील अनेक शहरांमध्ये सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. बुलढाणा जिल्ह्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला.

वीज पडून तीन पाळीव जनावरांचा मृत्यू झाला. अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. नागपूर शहरात सलग तीन दिवसांपासून पाऊस कोसळत असून गारपीटही होत आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा बराच कमी झाला आहे.