बिपीन देशपांडेऔरंगाबाद : धरणांची वाढती संख्या आणि विदेशी माशांच्या वाढत्या शिरकावामुळे अनेक देशी मत्स्य प्रजातींचा अधिवास धोक्यात आला आला आहे. मराठवाडा-विदर्भासह राज्यातील इतर भागातील खळाळत्या गोडय़ा पाण्यातील देशी १६ ते १७ मत्स प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातल्या महाशीर या मत्स्य प्रजातीला आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाने (आययूसीएन) नामशेषच्या यादीत समाविष्ट केले असून त्याचे आता इंद्रायणी नदीत कृत्रिम बीजाद्वारे पुनरुज्जीवनही होत असले तरी त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. महाशीरचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मुंबई येथील सेन्ट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरी एज्युकेशन (सीआयपी), तळेगावची फ्रेंड्स ऑफ नॅचरल असोसिएशन (निसर्गमित्र) व केंद्र सरकारच्या कृषी विभागाअंतर्गत येणारे हैदराबाद येथील केंद्रीय मत्स्य विकास मंडळ (एनएफडीबी) यांच्या संयुक्त विद्यमाने एक प्रकल्प हाती घेण्यात आला होता. लोणावळय़ातील संशोधक एस. एन. ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदीतील इंद्रायणी नदीत महाशीरचे कृत्रिम बीज सोडण्यात आले होते. मात्र, त्यातून अपेक्षित पुनरुज्जीवन होऊ शकले नाही. अगदीच काही प्रमाणात महाशीरचे पुनरुज्जीवन होत आहे. मात्र, विदर्भात भाडर, तंबू, वाडीस आणि वारंजा या मत्स्यप्रजाती जवळपास नामशेष झाल्या आहेत. तर मराठवाडय़ातून झोर, कुरडू, सुंगळय़ा आणि काळूशी (लिबिओकालबासू) या प्रजाती अत्यंत दुर्मीळ झाल्या आहेत, अशी माहिती अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक तथा मत्स्य अभ्यासक प्रा. डॉ. विश्वास साखरे यांनी दिली. धरणांची वाढती संख्या माशांच्या अधिवासावर परिणाम करणारी ठरत असल्याचे निरीक्षण नोंदवताना प्रा. डॉ. विश्वास साखरे यांनी सांगितले, तंबू, अहीर (अँग्युला) या माशांचा धरणांमुळे नदीमार्गे समुद्राकडे जाण्याचा आणि हिल्सासारख्या माशाचा समुद्राकडून नदीकडे स्थलांतर करण्याचा मार्ग थांबला आहे. काही मासे समुद्राला नदी जिथे मिळते त्या निमखारा भागातही स्थलांतर करतात. अहीर मासा प्रजननासाठी समुद्रात दूपर्यंत स्थलांतर करायचा. आज अहीर, गारागोटल्या (सुंगळय़ा), महाशीर, या देशी माशांच्या प्रजाती कायमस्वरुपी लुप्त झाल्या आहेत. तर उजनी धरणात पूर्वी मोठय़ा प्रमाणात आढळून येणारा कटला-रोहूही जवळपास नामशेषच झाल्यासारखा आहे. आज उजनीत एखादा कटला सापडला तर त्याची चर्चा होते, अशी परिस्थिती आहे. कोळशी मासा, झोरही (ऑक्सिगॅस्टर) दुर्मीळ झाला आहे. तर तिलापियासारख्या विदेशी माशांची मोठय़ा प्रमाणात वाढ दिसून येत आहे. राज्यात जवळपास ३ लाख हेक्टर हे धरणांचे क्षेत्र आहे. तीनशेपेक्षा अधिक लघु, मध्यम व मोठी धरणे आहेत. जागतिक बँकेने अलीकडे मोठय़ा धरणांसाठी कर्ज देणेही बंद केले आहे. देशी माशांच्या प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर तर विदेशी माशांचा वाढता वावर यासंदर्भात अभ्यासून केलेला एक अहवाल राज्याच्या मत्स्य विभागालाही देण्यात आला आहे. मात्र, त्यावर अद्याप काहीही झालेले नाही. देशी माशांच्या प्रजाती लुप्त होण्याकडे गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. १६ ते १७ प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. धरणांची वाढती संख्या, नदीकाठच्या शेतीमध्ये रासायनिक औषधांचा मारा, यामुळे देशी माशांचे अस्तित्वच इतिहास जमा होत आहे. - प्रा. डॉ. विश्वास साखरे, मत्स्य अभ्यासक.