औरंगाबादमध्ये १५ दिवसांत दोन खुनाच्या घटना औरंगाबाद शहरात मागील १५ दिवसांच्या अंतरात संकेत कुलकर्णी व अजय तिडके या तरुणांचे एकतर्फी प्रेमातून हत्याकांड घडले. कधीकाळी जिवलग मित्र असलेल्या मित्रांनीच आपल्या सहकाऱ्याचा अत्यंत निर्घृणपणे खून केला. तरुण-तरुणींमधील मैत्रीपूर्ण संबंधांत निर्माण झालेल्या समज-गैरसमजातून या घटना घडल्याचे प्रथमदर्शनी समोर येत असले, तरी त्यामुळे शैक्षणिक क्षेत्र, पालकवर्ग हादरून गेला आहे. मुलांना उच्च शिक्षणासाठी शहरांमध्ये ठेवावे की नाही, ठेवले तर संकेत कुलकर्णीचा मारेकरी संकेत जायभाय किंवा अजयचा खून करणारा मंगेश वायवळ यांच्यासारखा मार्ग तर ते अवलंबणार नाहीत ना, अशी चिंता पालकवर्गातून बोलून दाखवली जात आहे. उपेंद्र धुमाळ रविवारी मुलाच्या जेईई परीक्षेच्या निमित्ताने औरंगाबादेत आले होते. ते सांगत होते की, आपल्याला जे घेता आले नाही, ते उच्च शिक्षण मुलांना मिळावे. पोटाला चिमटा घेऊन का होईना त्याला मोठय़ा शहरात शिकवण्यासाठी पाठवायचे आहे. तो शिकला तर त्याचे भविष्य घडेल. आम्हाला त्याच्याकडून काही अपेक्षा नाहीत. शहरांमधील शैक्षणिक जीवन, राहणीमान मिळण्यासाठी आपण चार तास आणखी राबू शकतो. पण मुले सरळपणे शिकली पाहिजेत. संगतगुणांमुळे बिघडली तर त्याच्यासोबतच आमचेही भवितव्य अंधकारमय होईल. धुमाळ यांची अपेक्षा हीच की मुलाने अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. उगाच मोबाइल, मैत्रीण यामध्ये वाहत जाऊ नये. त्याला जीवनात नेमके काय करायचे आहे, याचा विसर पडू नये. त्याला एखाद्या परीक्षेत अपयश आले तर ते आपण समजूनही घेऊ. फक्त लक्ष त्याचे अभ्यासावर केंद्रित झालेले असावे. विद्यार्थ्यांमध्ये मित्र-मैत्रीण असे नाते आता नवे राहिले नाही. अगदी सहावी-सातवीच्या विद्यार्थ्यांनाही एखादी मुलगी किंवा मुलगी मित्र-मैत्रीण म्हणून हवी असल्याचे दिसून येत आहे. मुला-मुलींमधील मैत्रीच्या नातेसंबंधावर बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सायन्स मॅनेजमेंटची विद्यार्थिनी मनोमंजिरी सांगत होती की, विशिष्ट चौकटीत राहूनच हे नाते सांभाळायला हवे. आपण एक मुलगी आणि मित्र हा जर मुलगा असेल तर त्या दोघांमधील लिंगभेदाची जाणीव असायला हवी. आई आणि मुलगा हे नाते जरी पवित्र असले तर त्यातही एक स्त्री-पुरुष या धाग्यानुसार मर्यादा असते. श्रद्धा सांगत होती, मित्र-मैत्रीण होण्यात तसे गैर नाही. पण नात्यांमधील मर्यादा जपली पाहिजे. प्रेमाकर्षण आणि मैत्री यामधील फरक वेळीच समजून घेतला तर धोका निर्माण होत नाही. बॉयफ्रेंड मित्र असेल तर त्याला प्रेमाकर्षण आणि मैत्रीची वेळीच जाणीव करून द्यायला हवी. दोन्हीमध्ये गल्लत होता कामा नये. रेखाच्या मते, मैत्रीमध्ये समजूतदारपणा महत्त्वाचा. गुण-दोषांसह एखाद्याला जाणीव करून दिली तरी गैरसमज न होता मैत्रीत अंतर पडता कामा नये. दिलखुलासपणे दोषही स्वीकारता आले पाहिजेत. सोनाली व सोनल यांच्या मते, तरुणाई व पालकांमध्येही एक मैत्रीपूर्ण नाते असायला हवे. पालकांशी संवाद हवा. पालकांनीही मुलांसोबत बोलण्यासाठी वेळ काढणे गरजेचे आहे. वैभव सांगतो की, तसे पाहिले तर मित्र आणि मैत्रीण हे नाते वाईट नाही. परस्परांसोबतच पालकांमध्येही त्याबाबत विश्वास निर्माण करायला हवा. दोन तरुण मित्र होत असतील तर एक तरुणी आणि एक तरुण मित्र का होऊ शकत नाहीत? पालकांना त्याबाबत चिंता वाटणे स्वाभाविक आहे. पण विश्वास निर्माण केला तर गैरप्रकार घडणार नाहीत. एकमेकांच्या भावना समजून घेतल्या तर तरुण-तरुणींमधील मैत्री या नात्याचे गैरअर्थ काढले जाणार नाहीत आणि ते नातेही बदनाम होणार नाही.ू संकेत कुलकर्णी याची हत्या कारखाली चिरडून करण्यात आली, तर अजय तिडके याला खास पुण्याहून आणलेल्या बेल्टने गळा आवळून संपवले. या दोन्ही घटना आणि आरोपी वेगवेगळे असले तरी त्यांच्यातील हिंसकवृत्ती ही विचार करायला लावणारी आहे. शालेय पातळीवरच मुलांशी संवाद साधण्याची खरे तर वेळ आलेली आहे. लव्ह शब्द ऐकला तरी मुले हसू लागतात. याचा अर्थ त्यांना अधिक समजू लागला आहे. मित्र-मैत्रीण या नातेसंबंधाची उकल त्यांच्यापुढे करायला हवी. तसेच करिअर आणि नातेसंबंध यापैकी कशाला प्राधान्य द्यायला हवे, भविष्यातील परिणामांची जाणीव त्यांना करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी मुलांशी आता मुक्त संवादच हवा. मुलांच्या एकांतातील वेळ, शाळा, क्लासनंतरच्या वेळाबाबत, मित्र-मैत्रिणींबाबत पालकांनीही जागरूक राहायला हवे. पालक व मुलांमधील नातेसंबंध बिघडणे हा एक आजार जडला असून त्यावर वेळीच विचार करायला हवा. जनजागृतीही आवश्यक आहे. - हेरंब कुलकर्णी, शिक्षणतज्ज्ञ आजकाल विद्यार्थ्यांना अनेक माध्यमे सहज उपलब्ध होत आहेत. पालकही त्यांना ते देत आहेत. त्याचा कसा वापर करावा, याचा विचार झाला पाहिजे. त्याचा सकारात्मकरीत्या वापर झाला तर हेच माध्यम ज्ञानरूपात लाभू शकते. अन्यथा त्यातून गुन्ह्य़ासारखा प्रकारही घडून येऊ शकतो. यासाठी विद्यार्थ्यांसोबतच पालकांनीही जागरूक असायला हवे. - रामेश्वर थोरात, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे)