मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी ध्वजारोहणास उपस्थित राहण्यास इम्तियाज जलील यांचा होकार औरंगाबाद : हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्याचे स्मरण म्हणून १७ सप्टेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमास गेली सात वर्षे सतत गैरहजर असणारे खासदार इम्तियाज जलील यांनी या वर्षी ध्वजारोहणास उपस्थित राहू, असे स्पष्ट केले आहे. मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमिन अर्थात एमआयएम या पक्षाचा इतिहास निजामाशी जोडलेला असल्याने खासदार जलील या कार्यक्रमास हजर राहात नव्हते, अशी टीका त्यांच्यावर होत असे. या वेळी मात्र ‘कोण रझाकार माहीत नाही’ असे म्हणत आम्हीही मराठवाडाप्रेमी आहोत, असा दावा खासदार जलील यांनी केला आहे. ध्वजारोहणाला उपस्थित राहताना त्यांनी राजकीय पटावर खेळलेली तिरकी चाल चर्चेचा विषय ठरली आहे. मराठवाड्याविषयीचे प्रेम व्यक्त करण्यासाठी केवळ एक दिवस ध्वजारोहण करणे हा निकष कसा असू शकतो, असा प्रश्न उपस्थित करत खासदार जलील यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर मंगळवारी टीका केली होती - ‘औरंगाबाद शहरातील रस्ते चकाचक झाले आहेत. पाणी शुद्ध मिळते आहे. मराठवाड्यातील विकासाचे प्रश्न सोडवून झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यासाठी त्यांच्या ताफ्यावर फुले उधळू,’ असे उपरोधिकपणे म्हणत राजकीय तिरकी चाल त्यांनी खेळली आहे. १७ सप्टेंबरच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विकासाचे न सुटलेले प्रश्न अधोरेखित करत ध्वजारोहणाला उपस्थिती लावू, असे खासदार जलील यांचे म्हणणे वेगवेगळ्या पातळीवर तपासले जात आहे. हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीत एमआयएम हा पक्ष कसा रझाकारी होता, या सांगणाऱ्या दस्ताऐवजांसह भारतीय जनता पक्षाने हैदराबादमध्ये एमआयएमची प्रतिमा निजामाच्या बाजूची होती, असा प्रचार निवडणुकीदरम्यान केला होता. औरंगाबादसह जेथे एमआयएम हा पक्ष निवडणुकीत उतरतो तेथे त्या पक्षातील उमेदवाराला आणि त्यांच्या नेत्यांना विरोधकांकडून रझाकार ही उपाधी दिली जाते. या पक्षाची पाळेमुळे कासिम रझवीशी जोडलेले आहे असा दावा केला जातो. मात्र त्या जुन्या पक्षाचा आणि नव्या एमआयएमचा काहीएक संबंध नाही, असे खासदार जलील आणि असदोद्दीन ओवेसी यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे कोण रझाकार माहीत नाही, असे वक्तव्य करत मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त होणाऱ्या ध्वजारोहणास हजर राहणार असल्याचे खासदार जलील यांनी या वेळी सांगितले. ‘गेली सात वर्षे या कार्यक्रमास जाणीवपूर्वक यायचे नाही, असे काही नव्हते. पण योगायोगाने येऊ शकलो नाही. गेल्या १७ सप्टेंबरला तर मराठवाड्याच्याच हिताची रेल्वेविषयक बैठक दिल्लीमध्ये होती. त्या बैठकीत हजेरी लावली होती. त्यामुळे माझे मराठवाडाप्रेम एक दिवसाचे नाही,’ असेही खासदार जलील यांनी सांगितले. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एमआयएमला पुन्हा रझाकाराशी जोडले जाऊ शकते आणि प्रचाराची पातळी या मुद्द्याभोवती केंद्रित होऊ शकते असे लक्षात आल्यानंतर उचलले हे पाऊल आहे, अशीही टीका केली जात आहे. इम्तियाज जलील यांनी जशी तिरकस टीका केली तसाच प्रतिटोला बुधवारी शिवसेनेकडूनही लगावण्यात आला. स्वातंत्र्यसैनिकांना भेटायला या वेळी याच, असे आग्रहाचे आमंत्रण शिवसेनेच्यावतीने राजू वैद्य यांनी खासदारांना पत्र लिहून केले आहे.