छत्रपती संभाजीनगर : गुरु रवींद्रनाथ टागोर यांनी सुभाषचंद्र बोस यांना लिहिलेल्या पत्राचा आधार घेत ‘ वंदे मातरम’ ला राष्ट्रीय गीत करण्यास एमआयएमचे अध्यक्ष असदोद्दीन ओवेसी यांनी विरोध केला. हे गीत दूर्गा देवीचे वर्णन असून त्यास मुस्लीम विरोध करतील असा टागोरांनी बोस यांना लिहिलेल्या पत्रातील मजकूर ओवेसी यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पत्रकार बैठकीत वाचून दाखवला. वंदे मातरम् वर आपण संसदेमध्येही भूमिका मांडल्याचे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.

‘ वंदे मातरम्‘ वर मत ऐकायचे आहे ना, मग आता ऐकून घ्यावे लागेल. असे म्हणत त्यांनी या वर भाष्य केले. माझे मत कदाचित तुम्हाला आवडणार नाही. पण लक्षात घ्या असे म्हणत त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांनी सुभाषचंद्र बोस यांना या अनुषंगाने लिहिलेल्या पत्रातील तिसरा परिच्छेद त्यांनी वाचून दाखवला. ते म्हणाले, वंदे मातरम् दशभूजाधारी दूर्गाचे वर्णन आहे. त्यामुळे बंगालमधील मुस्लिम हे गीत स्वीकारणार नाहीत. असे पत्रात नमूद आहे. जन – गण – मन हे राष्ट्रीय गीत आहेच. ते बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतील उद्देशिकेशी जोडलेले आहे.

संसदेत विविध धर्माचे लोक प्रतिनिधी निवडले जातात. ते विविधतेचे प्रतिनिधीत्व करते. त्यामुळे वंदे मातरम् हे गीत अस्थानी ठरेल असे टागोरांनी म्हटले होते. जी भूमिका टागोरांची होती तीच आमची होती. सुभाषचंद्र बोस आणि रवींद्रनाथ टागोर यांची देशभक्ती ही पंतप्रधानापेक्षा आणि माझ्यापेक्षा जास्तच होती. त्यामुळे ती भूमिका आमची असल्याचे ओवसी म्हणाले.

वंदे मातरम् हे गीत ज्या ‘आनंदमठ’ कादंबरीमध्ये लिहिले गेले आहे त्या पुस्तकात अनेक मुस्लिम विरोधी वाक्य आहेत. ही वाक्ये आजही वाचून दाखवली तरी आवडणार नाहीत. पण तेव्हाचे गीत आता लागू करताना रवींद्रनाथ टागोर यांचे हे पत्र आणि कादंबरीतील ती वाक्येही आवर्जून वाचावेत. हवे असेल तर तो मजकूर पाठविण्याची व्यवस्थाही करतो, असे ओवेसी पत्रकार बैठकीत म्हणाले.

वंदे मातरम हे गीत राष्ट्रगीत करण्याच्या हालचाली सुरू आहेत. संसंदेमध्ये सुरू असणाऱ्या पार्श्वभूमीवर ओवेसी यांनी वंदे मातरम् गीतास विरोध करण्यासाठी टागोरांच्या पत्राचा आधार घेतला आहे. त्या मजकुराच्या आडून वंदे मातरम गीतास राष्ट्रगीत करण्यास विरोध दर्शवला आहे. टागोरांचे हे पत्र कोणत्या पुस्तकातून घेतले आहे हेही ओवेसी यांनी सांगितले. बंकिमचंद्र चटर्जी यांनी आनंदमठ पुस्तकात इंग्रजांचे गुणगान केले असल्याचेही ओवेसी म्हणाले. मी हे वाचून दाखवले तर तुमच्या अधिक पोटात दुखेल असेही ओवेसी म्हणाले. जन गण मन हे भारत साजरे करतो.

उद्देशिका तयार करतानाही त्यात वंदे मातरम वापरावे अशी चर्चा झाली होती. पण तेव्हाच्या नेत्यांची देशभक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रा. स्व. संघापेक्षा अधिक होती. देवाच्या नावाच्या असेही लिहिण्याचे ठरवले जात होते. पण भारत हा कोणत्याही एका धर्माला मानणाऱ्यांचा नाही. तो सर्व धर्मियांचा आहे आणि अगदी नास्तिकांचाही आहे. हेच तुमच्या वंदे मातरम वरच्या प्रश्नाचे उत्तर आहे, असे ओवेसी म्हणाले.