औरंगाबाद : गेल्या दोन दिवसापासून वाढलेल्या थंडीत शुक्रवारी औरंगाबाद शहरातील काही भागात पावसाचा शिडकावा झाला. त्यामुळे गारव्यात वाढ झाली. मराठवाडय़ात नांदेड जिल्ह्यात गारपीट झाली होती. विदर्भात झालेल्या गारपिटीमुळे हवेतील गारवा वाढला आहे. दुपारच्या सत्रात काही वेळ सूर्यदर्शन झाले पण त्यानंतर दुपारी औरंगाबाद शहरात पावसाच्या सरी येऊन गेल्या. थंडी वाढल्याने शेकोटय़ाही पेटल्या. मकरसंक्रातीनंतर उत्तरायणात थंडी कमी होत जाते असे म्हटले जाते पण या वर्षी थंडीचा कार्यकाळ अधिक असेल, असे एमजीएम अंतराळ संशोधन केंद्राचे प्रमुख श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले. गेल्या तीन दिवसांपासून नोंदलेल्या जाणाऱ्या तापमानात मात्र शुक्रवारी काही वाढ दिसून आली आहे. १२ जानेवारी रोजी किमान तापमान १२.५ अंश सेल्सिअस एवढे होते. शुक्रवारी किमान तापमान १३.९ होते. मात्र सायंकाळी कमालीची थंडी वाढली. हा गारवा मराठवाडाभर आहे. त्यामुळे जागोजागी शेकोटय़ा दिसू लागल्या आहेत.