त्रिपुरात झालेल्या घटनेच्या निषेधार्थ काल राज्यात मुस्लिम संघटनांनी राज्यात विविध ठिकाणी निवेदने दिली. मात्र काही ठिकाणी याला हिंसक वळण लागलं होतं, अमरावतीतही गालबोट लागलं. या पार्श्वभुमिवर आज अमरावती बंदचे आवाहन भाजपाने केलं होतं. मात्र भाजपच्या या बंदच्या आवाहनला हिंसक वळण लागले. आक्रमक आंदोलकांनी दुकानांवर दगडफेक करत तोडफोड केली. यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेत दगडफेक करणाऱ्यांवर लाठीचार्ज केला. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“या देशात नव्यानं पेटवा-पेटवी करण्याचं काम भाजपाने सुरू केलंय. देशातील १३ राज्यात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये पराभव झाल्यापासून भाजपाच्या मनातील अस्वस्थता ही स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे भाजपाने पुन्हा एकदा हिंदू-मुस्लीम, जातीय दंगे, जातीय द्वेष ही त्यांची हत्यारं त्यांनी बाहेर काढायला सुरुवात केली आहे. राज्यातील दंगलखोर हे वेगळेच कुणीतरी आहेत. त्यांना दंगलीसाठी प्रायोजकत्व देण्यात आलंय. राज्यातील दंगल ही प्रायोजित असून सत्य लवकरच समोर येईल,” असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

“रझा अकादमीची ताकद आम्हाला माहित आहे, रझा अकादमी हे भाजपाचं पिल्लू आहे, ते भाजपाचा आवाज आहे, जे भाजपाला हवंय तेच रझा अकादमीतले लोकं करत असतात. तसेच रझा अकादमीला मुस्लीम समाजात अजिबात स्थान नाही, असं राऊत म्हणाले. विरोधा पक्षातील लोकांनी दंगली घडवण्याचं ठरवलं होतं, या दंगली मोडून काढल्या जाऊ शकतात. अमरावतीचं राजकारण गेल्या काही दिवसापासून सातत्याने बिघडवलं जातंय, यामागे कुणाचा हात आहे, हे सर्वानांच माहित आहे,” असं संजय राऊत म्हणाले.