महागाईविरोधात शिवसेनेकडून औरंगाबादेत आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात शिवसेना खासदार संजय राऊत देखील हजर होते. आमचंच सरकार मंत्रालयात आणि शिवसेना रस्त्यावर, असं संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले. “महागाई ही राष्ट्रीय समस्या आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करणं राज्य सरकारच्या हातात नाही, पेट्रोलियम कंपन्या महाराष्ट्र सरकारच्या मालकीच्या नाहीत, त्यामुळे दर कमी करणं हे केंद्र सरकारचं काम आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

शिवसेनेचा महागाई विरोधातील मोर्चा ढोंग असल्याच्या आरोपांना यावेळी बोलताना राऊतांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सिलेंडर घेऊन रस्त्यावर उतरल्या होत्या. आता इराणी आणि त्यांच्या पक्षाने महागाई कमी करण्यासाठी आंदोलन करावं, आम्ही पाठिंबा देऊ, असं ते म्हणाले. उज्वला योजनेतील अनेक सिलेंडर भंगारात निघाल्याचंही राऊत म्हणाले. देशात महागाईला कंटाळून १७ हजार लहान व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या आहेत, मात्र मोदी स्वतः १८ हजार कोटींचं विमान घेऊन फिरत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“केंद्र सरकार राज्य सरकारची आर्थिक कोंडी करतंय. सरकार पाडण्यासाठी रोज भाजपाची कारस्थाने सुरू आहेत. भाजपाचे लोक महागाईबद्दल बोलत नाही. त्रिपुऱ्यात घडलेल्या कोणत्यातरी घटनेसाठी भाजपा महाराष्ट्रात आंदोलन करत आहेत,” अशी टीका संजय राऊतांनी केली. “१०० दिवसात महागाई कमी करण्याचं वचन दिलं होतं, मात्र तुमचं सरकार येऊनही तुम्ही महागाई कमी केलेली नाही. महागाई बद्दल विचारल्यावर भारत-पाकिस्तान, सर्जिकल स्ट्राईक, भारत-चीनबद्ल बोलतात आणि मुळ मुद्दा बाजूला ठेवतात,” असा आरोप राऊतांनी भाजपावर केलाय.