औरंगाबाद : राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघांची नव्याने बांधणी करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांचे  दौरे सुरू असून  औरंगाबाद येथे भूपेंद्र यादव यांच्या  बैठकीमध्ये  ‘एमआयएम’च्या खासदारांची कार्यशैली,  ‘एमआयएम’ला मिळणाऱ्या मतांवर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘लाभार्थी मतदार व्हावेत’ या सूत्राला जिल्ह्यात बळकटी देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

‘एमआयएम’चे राजकीय विश्लेषण करणाऱ्या यादव यांनी हिंदू मतांचे होणारे विभाजन यावर मात्र पत्रकार बैठकीत बोलणे टाळले. सांस्कृतिकदृष्टय़ा तसेच विकास प्रश्नांवर लोक भाजपचे काम पाहत आहेत, त्यामुळे अन्य कोणाला प्राधान्य देणार नाहीत. भाजप, शिवसेना, मनसे आणि एकनाथ शिंदे यांचा गट हे सारेच हिंदूत्वाची भूमिका मांडू लागले आहेत. मात्र, यावर त्यांनी फारसे बोलणे टाळले.  सेवा व सांस्कृतिक राष्ट्रवादी शक्तीच्या आधारे मतदार भाजपला निवडतील. हे देशभरातील चित्र आहे. महाराष्ट्रही भारतातच येत असल्याने येथे काही बदल होणार नाहीत,’ असे ते म्हणाले. 

अनुच्छेद ३७० असेल किंवा राष्ट्रवादी सांस्कृतिक निर्माणातील विविध उद्देशात राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर मतभेद आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर मैत्रीची शक्यता नाही असे  भूपेंद्र यादव यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा नेता, भाजपची लाटही असते निवडणुकीत, काँग्रेसकडे नेतृत्वही नाही असे म्हणता, मग दीड वर्ष आधीच निवडणुकांची तयारी कशासाठी ? या प्रश्नाच्या उत्तरात भाजपचे उपाध्यक्ष भूपेंद्र यादव म्हणाले, की आम्ही पूर्ण पाच वर्षे राजकारण करतो. संघटनात्मकदृष्टय़ा सतत तयार असतो. त्यामुळे येत्या काळात औरंगाबादमध्ये दौरे होतील, असेही त्यांनी सांगितले.