औरंगाबाद: राज्यातील साखर कारखान्यांमधून इथेनॉल उत्पादन करतानाच्या प्रक्रियांमध्ये आता अनेक बदल झाल्याने कारखान्यातून निघणाऱ्या प्रदूषित पाण्याबाबतचे महामंडळाचे निकष मात्र जुनेच आहेत. त्यात तातडीने बदल करावेत अशी मागणी साखर कारखान्यांच्या वतीने पर्यावरण मंत्रालयास करण्यात आले होते. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीत चर्चा करण्यात आली. खरे तर आता कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या घाण पाण्याचे प्रमाण नऊ लिटरहून तीन लिटपर्यंत खाली आले असल्याने जुने नियम बदलावेत अशी विनंती राज्य सरकारच्या वतीने केंद्रीय प्रदूषण मंडळास केली जाणार असल्याचे साखर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. इथेनॉल निर्मिती केवळ ‘ सी हेवी’ मळीपासून होत असते. आता उसाच्या रसापासूनही इथेनॉल उत्पादन घेतले जाते. पूर्वी एक लिटर इथेनॉल उत्पादन हाती घेतले तर नऊ लिटपर्यंत पाणी लागत असे. पण आता ते प्रमाण अडीच ते तीन लिटरएवढे खाली आले आहे. मात्र, प्रदूषण मोजण्याचे निकष जुनेच आहेत. त्यामुळे कारखान्यांना नाहक मनस्तापास सामोरे जावे लागते. या अनुषंगाने वसंतदादा साखर संस्थेतील तज्ज्ञांनी प्रदूषण व बदलावयाचे निकष याबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली. असे निकष ठरविण्याचे अधिकार केंद्रीय पर्यावरण मंत्रालयास असल्याने याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे लवकरच पाठविला जाणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले.