नागपूर, पुणे शहराचाही समावेश औरंगाबाद: इशान्याकडील आसाम वगळता अन्य राज्यांना दिल्ली जोडणे तसेच मालवाहतुकीची गती वाढविण्याबरोबरच देशातील ७० रेल्वेस्थानकांचा विकास विमानतळाप्रमाणे करण्यात येणार आहे. त्याच्या निविदा एक महिन्याच्या आत प्रसिद्ध होतील असे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. यामध्ये नागपूर, पुणे यासह मोठ्या शहरातील स्थानकांचा समावेश असेल असे ते म्हणाले. रेल्वेच्या वेगाची क्षमता ८० किलोमीटर प्रती तास आहे. पण प्रवासी व मालवाहतूक ही एकाच रुळावरून होत असल्याने मालवाहतुकीचा वेग ३० किलोमीटर प्रती तास एवढ्या पर्यंत खाली आला आहे. पूर्वी बहुतांश मालवाहतूक रेल्वेने होत असे आता त्याचे प्रमाण कमालीचे घटले असल्याने मालवाहतुकीसाठी उत्तर व दक्षिण विभागासाठी दोन कॉरिडॉर केले जाणार असून त्यासाठी प्रत्येकी ५० हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. पण असे करताना रेल्वे स्थानकांचा विकास करण्याची योजना आखली जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांसमवेत खास बैठक घेऊन स्थानकांच्या विकासाचा आढावा घेतला. रेल्वेस्थानकांचा चेहरा अजूनही ब्रिटिशकालीन असून त्यात बदल केले जातील. तशा निविदा येत्या महिनाभरात निघतील असे ते म्हणाले. त्यातील काही स्थानके २०२४ मध्ये पूर्ण केली जातील. तसेच वंदेभारत योजने अंतर्गत ७५ रेल्वे सुरू केल्या जाणार असून त्यातील दोन रेल्वे सुरू झाल्या असल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. वैष्णवदेवी व बनारस मार्गे या दोन रेल्वे सुरू असून ४४ रेल्वे सुरू केल्या जाणार आहेत. तसेच धार्मिक स्थळांना रेल्वेने जोडणार आहोत. पुण्याहून रामपथ नावाची रेल्वे सुरू केली असून भारतगौरव ही रेल्वेही सुरू केली जाणार आहे. खासगी टर्मिनलही सुरू करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे. नांदेड- मनमाड रेल्वेच्या दुहेरीकरण ९८ किलोमीटरच्या सर्वेक्षणास निधी दिला असल्याचेही दानवे यांनी सांगितले आहे. यासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी मिळेल असेही ते म्हणाले.