बिपीन देशपांडे औरंगाबाद : शहराजवळील म्हरोळा हे अवघे ३५० उंबऱ्यांचे गाव. या गावातील स्वामी समर्थ स्वयंसहायता गटातील महिलांनी तयार केलेल्या मातीच्या दागिन्यांना (टेराकोटा ज्वेलरी) वितरण व्यवस्थेतील ख्यात कंपनी असलेल्या अॅमॅझॉनसारखे व्यासपीठ मिळाले आहे. या दागिन्यांना उत्तर भारतासह मुंबई, दिल्लीकरांकडूनही विशेष पसंती मिळत आहे. जिल्हा ग्रामीण विकास केंद्रांतर्गत येत असलेल्या मराराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका मिशनच्या माध्यमातून चालणाऱ्या सोशल इन्क्लूजन कॅपॅसिटी बििल्डगचे (आयबीसीडी) पैठण तालुका व्यवस्थापक महेंद्र नरवडे व मुंबईच्या प्रियंका जवळकर यांच्या माध्यमातून स्वामी समर्थ स्वयंसहायता गटातील महिलांना टेराकोटा ज्वेलरी दागिने निर्मितीचे कौशल्य प्रशिक्षणातून देण्यात आले. प्रियंका जवळकर यांच्या कंपनीकडून टेराकोटा दागिन्यांच्या खरेदीची हमी स्वीकारण्यात आली. या दागिन्यांना उत्तर भारतात विशेष मागणी असल्याचे मुंबईतील नेरूळ व दिल्लीत झालेल्या स्वयंसहायता गटाच्या प्रदर्शनातूनही समोर आले. दागिन्यांची मागणी वाढत असल्याचे पाहून अॅमॅझॉनसारख्या वितरण व्यवस्थेतील प्रमुख कंपनीशीही संपर्क साधण्यात आला. तेथूनही चांगली मागणी वाढल्याचे आयबीसीडीचे महेंद्र नरवडे व स्वामी समर्थ स्वयंसहायता गटाच्या प्रमुख कालिंदी प्रवीण जाधव यांनी सांगितले. टेराकोटा दागिन्यांचे प्रशिक्षण ते विक्री व्यवस्थापनाबाबती माहिती देताना कालिंदी प्रवीण जाधव यांनी सांगितले की, प्रियंका जवळकर यांच्याकडून दागिन्यांसाठी लागणारी विशेष माती पाठवली जायची. २०१७ पासून दागिन्यांची विक्री केली जात आहे. महिलांचा आभूषणातील अनेक प्रकार तयार केले जातात. तयार माल मुंबईला प्रियंका जवळकर यांच्याकडे पाठवला जायचा. तेथे रंगरंगोटी आणि आवरणात बंदिस्त केले जायचे. मध्यंतरी करोनामुळे विशेष माती येणे थांबले होते. दरम्यान, आता आणखी डाळबट्टी, ढोकळा, ईडलीचे पीठ तयार केले जात आहे. त्यालाही मराठवाडा, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रातून मागणी आहे. टेराकोटा दागिन्यांनाही मागणी येत आहे. अॅमॅझॉनवर उत्पादित मालाला व्यासपीठ मिळाल्यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढला आणि गुणवत्तेवरही लक्ष केंद्रित झाले.