सुहास सरदेशमुख, लोकसत्ता औरंगाबाद : कोविड संसर्गाचा फटका बसल्याने औरंगाबाद जिल्ह्याच्या पर्यटनाला फटका बसला आहे. कोविडपूर्व वर्षांत म्हणजे २०१९-२० या वर्षांत १९ लाख ७७ पर्यटक वेरुळ, अजिंठा, दौलताबाद किल्ला व शहरातील बीबी का मकबरा या पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी आले होते. या वर्षी पर्यटकांची ही नोंद पाच लाख ९४ हजापर्यंत घसरली आहे. विदेशी पर्यटकांची संख्या तर कमालीची घसरली असल्याने पर्यटनासाठीची डेक्कन ओडिसी तर जवळपास बंदच आहे. या कंपनीकडे ही ट्रेन चालविण्याचे कंत्राट दिले होते त्या ‘कॉस्क अॅड किंग’ कंपनीचेही दिवाळे निघाले. करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर परिस्थिती सामान्य होत असताना करोना व ओमायक्रॉन संक्रमणाची तिसरी लाट येत असल्याने पर्यटनाच्या योजना पुन्हा गुंडाळण्याची वेळ आली आहे. पर्यटकांना लागलेल्या गळतीमुळे पर्यटनस्थळी काम करणाऱ्या वाटाडय़ांचे (गाईड) हाल सुरू आहेत. वेरुळ व अजिंठा येथे ६० गाईड होते. पण त्यातील अनेकांनी आता व्यवसाय बदलले आहेत. त्यामुळे नव्याने गाईड म्हणून काम करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. कोविडपूर्व काळात महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या विश्रामगृहात केवळ २७ टक्के खोल्यात पर्यटक थांबत. आता तर त्यात कमालीची घट झाली आहे. विदेशी पर्यटकांची संख्याही आता कमालीची घटली आहे. कोविडपूर्व काळात ही संख्या ४० हजारांच्या घरात होती. या वर्षी नोव्हेंबपर्यंत केवळ ७६३ विदेशी पर्यटकांनी वेरुळ, अजिंठा, दौलताबादचा किल्ला व बीबी का मकबरा आदी पर्यटनस्थळांना भेटी दिल्या. बहुतांश कालावधी पर्यटनस्थळे बंद असल्याने त्यावरील गुजराण करणाऱ्यांनी आता व्यवसाय बदलले आहेत. खरे तर काश्मीर, कुलु- मनाली, गोवा अशा पर्यटनस्थळांवर गर्दी वाढते आहे. पण वेरुळ- अंजिठा या जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळांकडे संख्या वाढत नसल्याचे चित्र आहे. अन्य पर्यटनस्थळावर असणारा ‘आनंद’ आणि सुविधा याची तुलना करून सुविधा वाढविण्याची गरज आहे. या भागात काही सहासी खेळ सुरू करता येऊ शकतात. त्याची चर्चा होते आणि नंतर सारे बिनसते. औरंगाबाद टुरिझम फाऊंडेशनचे जसवंत म्हणाले, पर्यटन व्यवसाय पूर्णत: थांबल्यासारखे वातावरण आहे. सर्वाधिक फटका प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर पडला आहे. पूर्वी एकेका एजन्सीकडे २० वाहनचालक असत. आता गरज असेल तेव्हा एखाद्या वाहनचालकाला बोलावून काम दिले जाते. आता बहुतांश पर्यटक स्वत:चे वाहन घेऊन जाण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यामुळे करोनोत्तर काळात वाहनचालकांनी स्वत:ची वाहने घेतली. पण त्यांनाही पुरेसे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत.’ पर्यटक स्थळनिहाय माहिती २०१९-२० भारतीय पर्यटक विदेशी पर्यटक १ अजिंठा २७३३४४ २१५४८ २ वेरुळ ११७७८५ २६२६६९ ३ औरंगाबाद लेणी १२७६६४ १४४७ ४ दौलताबाद किल्ला ४६५१६८ ५१३८ २०२१ मध्ये नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक दोन लाख ३५ हजार ६५१ पर्यटक औरंगाबाद येथे आले होते. तर विदेशी पर्यटकांची संख्या ४१२ एवढी होती. जून ते नोव्हेंबर या कालावधीत ७६३ विदेशी पर्यटक आले.