औरंगाबाद : केंद्रीय अर्थसंकल्पाची तयारी सुरू असून त्या बैठकांना राज्यातील प्रमुख मंत्र्यांची गैरहजेरी असल्याबद्दल केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी नाराजी व्यक्ती केली आहे. सात राज्यांचे मुख्यमंत्री बैठकीला येतात पण महाराष्ट्रातून कोणीच येत नाही. मुख्यमंत्री आजारपणामुळे येऊ शकत नाहीत, हे मान्यच पण अर्थमंत्रीही गैरहजर असतात असे सांगत राज्याच्या कारभारावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जेव्हापासून अर्थ राज्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतला आहे तेव्हापासून आर्थिक समावेशनाच्या उपक्रमास अधिक वेग दिला असल्याचा दावाही त्यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत केला. अन्य कोणत्याही राजकीय प्रश्नाला उत्तरे देण्याचे टाळत त्यांनी बुधवारी दोन एटीएम वाहने ग्रामीण भागासाठी सुरू करण्याच्या मोहिमेचे त्यांनी उद्घाटन केले. औरंगाबाद जिल्ह्यात अशी चार वाहने देण्यात येणार असून राज्यात नाबार्डमार्फत १७ वाहने दिली जाणार आहेत. मुद्रा, पंतप्रधान स्वनिधी, किसान क्रेडीट कार्ड आदी योजनांमध्ये चांगली प्रगती झाली असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी त्यांच्यासमोर सादर केला. दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तयारीत महाराष्ट्रातील मंत्री पुढाकार घेत नसल्याचे सांगत त्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर नाव न घेता निशाना साधला. औरंगाबादेत शेतकरी प्रशिक्षण केंद्र औरंगाबाद शहरात पंजाब नॅशनल बँक व नाबार्डच्या सहकाऱ्याने शेतकरी प्रशिक्षण केंद्र सुरू केले जाणार असून या केंद्राला जागा कोठे उपलब्ध करून देता येईल याची चाचपणी करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्तांकडे सोपविण्यात आली असल्याचे त्यांनी वित्तीय समावेशन मोहीम उद्घाटन कार्यक्रमात सांगितले. अलीकडेच उत्तराखंड येथील राज्यस्तरीय बँकाच्या बैठकी दरम्यान पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकाऱ्याशी चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.