नांदेड, छत्रपती संभाजीनगर : भारत-पाकिस्तान युद्धाची व्याप्ती वाढत चालली आहे. दोन्ही बाजूंनी बॉम्ब व मिसाईलचा मारा सुरू असून, जम्मू-काश्मीर व दिल्लीमध्ये पर्यटकांनी येणे टाळावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ९० टक्के पर्यटकांनी आपल्या नियोजित सहली रद्द केल्या आहेत. याबरोबरच हिमाचल प्रदेश, हरियाणा, सिमला, कुलू, मनाली या भागातही पर्यटक जाण्यास कचरत आहेत.

रस्ते, रेल्वे व हवाई असे तिन्ही मार्ग नांदेडकरांसाठी प्रशस्त झाले असल्यामुळे लोक प्रामुख्याने जम्मू-काश्मीर व हिमाचल प्रदेश या भागात पर्यटनास जातात. पर्यटकांनी जम्मू-काश्मीरमध्ये येणे टाळावे, अशा सूचना जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे नांदेड परिसरातील सुमारे १० ते १५ हजार पर्यटकांनी जम्मू-काश्मीरसह उत्तर भारतातील नियोजित सहली रद्द केल्या आहेत. वातावरणात लक्षणीय बदल झाल्यास मराठवाड्यातील पर्यटक पश्चिम महाराष्ट्रातील धार्मिक पर्यटन, तसेच कोकणातील निसर्ग पर्यटन अनुभवण्याच्या मन:स्थितीत असल्याचे दिसून येते.