आज (शुक्रवार) औरंगाबाद येथील पत्नी पीडित पुरुष आश्रमात जागतिक पुरुष दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शीर्षासन आंदोलन करत हा विशेष दिवस पुरुषांनी साजरा केला. तसेच आंदोलक पुरुषांनी त्यांच्या हक्क व संरक्षणासाठी विविध मागण्या केल्या. "जागतिक महिला दिन ८ मार्च सर्वांच्याच लक्षात असतो. त्याचप्रमाणे जागतिक पुरुष दिन हा १९ नोव्हेंबरला असतो. हे बहुतांश पुरुषांनाही माहित नाही. महिला दिनामध्ये पुरुषांचाही सहभाग असतो अगदी त्यांच्या सत्कारापासून तर कौतुक सोहळ्यापर्यंत सर्व ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी पुरुष सक्रिय असतात. अनेक शासकीय कार्यालयात महिला दिन साजरा केला जातो. परंतु पुरुष दिन कुठल्याही शासकीय कार्यालयात साजरा होताना दिसत नाही," अशी नाराजी उपस्थित पुरुषांनी बोलून दाखवली. "स्त्रियांना सक्षम करण्यासाठी ज्याप्रमाणे कायदे तयार करून त्यांना कायद्याचे रक्षण दिले अगदी तसेच पुरुषांना स्त्रियांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आणि त्यांना स्त्रियांच्या बरोबरीने लढण्यासाठी आता खरोखर कायद्याची गरज आहे. यासाठी आज पत्नी पीडित पुरुष आश्रमात जागतिक पुरुष दिन साजरा करून पुरुषांवर होणारा अन्याय अत्याचार कसा संपवता येईल तसेच पत्नीकडून केसेस झाल्यावर पुरुषांनी काय करायाचे" याबाबत चर्चा केल्याचे पुरुषांनी सांगितले. यावेळी पत्नी पीडित पुरुष आश्रमाचे संस्थापक अॅड. भारत फुलारे, चरणसिंग गुसिंगे, पांडुरंग गांडूळे, सोमनाथ मनाळ, वैभव घोळवे, सुरेश फुलारे, जगदीश शिंदे, अॅड दासोपंत दहिफळे, इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्नी पीडित पुरुष करत आहेत आत्महत्या "पत्नी पीडित पुरुष हे समाजात न्याय न मिळाल्याने हताश होऊन आत्महत्या करत आहेत. एनसीआरबीच्या अहवालावरून हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुरुषांना देखील कायद्याचे संरक्षण दिले गेले पाहिजे. सद्यस्थितीमध्ये स्त्रियांच्या बाजूने असलेल्या भरमसाठ कायद्याचा आधार घेत स्त्रिया पुरुषांना गुलाम बनवत आहेत," असा आरोप पीडित पुरुषांनी केला आहे. लग्न करणे म्हणजे सर्वात मोठा गुन्हा "लग्न करणे म्हणजे सर्वात मोठा गुन्हा केल्याप्रमाणे झाले आहे. इतर गुन्ह्यातून तरी सुटकेची शक्यता असते. परंतु लग्नाच्या गुन्ह्यात नसते. लग्नानंतर पुरुषाचा मृत्यू झाला तरी पत्नी त्याच्या संपत्तीवर दावा ठोकतात. स्त्रियांच्या या जाचाला पुरुष कंटाळले आहेत. स्त्रियांच्या गुलामगिरीतून सुटण्यासाठी पुरुषांच्या बाजूने कायदे करण्याची वेळ आली आहे." असे मत पत्नी पीडित पुरुष आश्रमातील पुरुषांनी मांडले आहे.