पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे महागाईने होरपळलेल्या जनतेला सरकारने आणखी एक झटका दिला आहे. आज म्हणजेच १ एप्रिल २०२२ पासून सरकारने राष्ट्रीय महामार्गावरील (NHAI) टोल करातही वाढ केली आहे. शुक्रवारी रात्री बारा वाजल्यापासून टोल टॅक्समध्ये वाढ करण्याचा सरकारचा निर्णय लागू झाला आहे. याचा थेट परिणाम मालाच्या वाहतुकीवर आणि सामान्यतः एका शहरातून दुस-या शहरात जाणाऱ्या कारस्वारांवर होणार आहे. आता जनतेला महागाईच्या दुहेरी तडाख्याला सामोरे जावे लागत आहे कारण आधी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आणि आता टोल टॅक्सचे वाढलेले दर यामुळे जनतेचा प्रवास महाग झाला आहे. आजपासून टोल टॅक्समध्ये सुमारे १० ते १२ टक्के वाढ झाली आहे.

अतिरिक्त बोजा खिशावर

जे लोक दर महिन्याच्या पासवर (४० लोकांसाठी) ७६५ रुपये टोल म्हणून जमा करायचे, ते आता ८७५ रुपये जमा करतील. अशा परिस्थितीत दैनंदिन प्रवाशांना सुमारे ११० रुपयांचा जादा बोजा सहन करावा लागणार आहे. एनएचएआयचा टोल वाढवण्याचा निर्णय टोलच्या देखभालीचा वाढता खर्च आणि टोल कंपन्यांच्या विनंतीवरून घेण्यात आला आहे. एका मीडिया हाऊसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, NHAI च्या संचालकांनी याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, लोकांना आता दिल्लीला जोडणाऱ्या महामार्गावर अधिक टोल भरावा लागणार आहे. आता लोकांना सुमारे १० रुपये अधिक टोल भरावा लागणार आहे. त्याचबरोबर टोल वाढवण्याचा सर्वाधिक फटका मोठ्या वाहनांना बसणार असून त्यात सुमारे ६५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हे सर्व दर ३१ मार्च रोजी दुपारी १२ वाजल्यापासून लागू करण्यात आले आहेत.

(हे ही वाचा: LPG Cylinder Price Hike: व्यावसायिक सिलिंडरच्या दरात २५० रुपयांची वाढ! सर्वसामान्यांच्या खिशावर ‘असा’ होणार परिणाम)

FASTag नसलेल्यांचे होणार मोठे नुकसान

हे लक्षात घेण्यासारखे आहे की ज्या लोकांच्या वाहनांमध्ये अद्याप फास्टॅग बसवलेले नाहीत त्यांच्याकडून आता अधिक टोल आकारला जाईल. फास्टॅग नसलेल्या वाहनांवर आता पूर्वीपेक्षा दुप्पट टोल आकारला जाणार आहे. यापूर्वी फास्टॅगशिवाय कोणत्याही वाहनाकडून २०० टोल आकारला जात होता. आता त्या वाहनाकडून ४०० रुपये टोल आकारला जाणार आहे. तुम्ही अजून तुमच्या वाहनात फास्टॅग लावला नसेल, तर हे काम लवकरात लवकर पूर्ण करा. अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. आजच तुमच्या घराजवळील कोणत्याही फास्टॅग केंद्राला भेट देऊन हे काम पूर्ण करा.