प्राची मोकाशी

दाराची बेल वाजल्याबरोबर आईने लगबगीने टीव्ही बंद केला आणि तिने दार उघडलं. दुपारची वेळ होती. रोहन शाळेतून थोडा वैतागून घरी आलाय असं आईला जाणवलं.

‘‘आई, कोण भांडत होतं?’’ घरात शिरताच रोहन अस्वस्थपणे इथे-तिथे पाहायला लागला.

‘‘कुणी नाही. टीव्ही सुरू होता. पण तुझा सूर का बरं बिघडलाय?’’

‘‘टीव्हीवर पुन्हा तेच-तेच का! लढाई करायची, नाही करायची, सर्जकिल स्ट्राइक झाला, नाही झाला.. या टीव्हीवाल्यांना आयता खुराक मिळालाय दिवसभर चघळायला. आज मधल्या सुट्टीत आरव त्याच्या बाबांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या एका फॉरवर्ड मेसेजबद्दल सांगत होता. म्हणे जो कुणी लढाई करण्याला विरोध करेल तो देशद्रोही! असं असतं का कधी?’’ यावर काहीच न बोलता दोघांसाठी जेवण आणायला आई स्वयंपाकघरात गेली.

‘‘आई, मामीचा काही फोन? मामाची काही खबरबात?’’ आईने नकारार्थी मान डोलवली आणि पुन्हा कामाला लागली. रोहनच्या मामाचं पोस्टिंग सध्या बॉर्डरवर असल्यामुळे दहशतवादी हल्ला झाल्यापासून घरात गेले काही दिवस चिंतेचं वातावरण पसरलं होतं. रोहनने चूपचाप रूममध्ये जाऊन कपडे बदलले आणि हातपाय धुऊन तो जेवायला बाहेर आला. ताटं वाढून तयार होती.

‘‘आज तुझ्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी नोट पाठवलीये सगळ्या पालकांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर, की सध्याच्या या तणावपूर्ण वातावरणात तुम्हा मुलांना या सगळ्या चर्चापासून लांब ठेवा म्हणून. तुमची फायनलची परीक्षाही आता जवळ आलीये तर तुमचं लक्ष अभ्यासापासून विचलित व्हायला नको. पण सगळीकडूनच इतकी वादावादी आणि चर्चा सुरू असताना एकंदरीतच हे अवघड दिसतंय.’’

‘‘म्हणून मी घरी आल्या आल्या तू टीव्ही बंद केलास?’’ यावर आई हलकं हसली. दोघे जेवू लागले.

‘‘आई, मी मोठा झालो की सायंटिस्ट बनणार आणि मामाला मदत करणार!’’ अचानक रोहन म्हणाला.

‘‘अरे व्वा! पण कालपर्यंत तर तुला क्रिकेटर व्हायचं होतं नं!’’

‘‘हो! पण आपला देश असा लढाईच्या तयारीत असताना मी खेळण्याचा कसा विचार करू?’’ आईने रोहनच्या ताटात भात वाढला.

‘‘दहीपण वाढ नं थोडं! आई, गेले काही दिवस टीव्हीवर सारखं दाखवत असतात नं, सीमेवर चकमकीमध्ये शहीद झालेले आपले जवान, लढाई करायची की नाही यावरून सतत होणारी वादावादी.. हे सगळं ऐकून एकदम राग-राग होतो माझा. या दहशतवाद्यांना शोधून शोधून मारलं पाहिजे. आपल्या सनिकांच्या बलिदानाचा बदला घ्यायचाय मला!’’ रोहन भात कालवत एकदम आवेशात म्हणाला.

‘‘त्यासाठी तू जवान व्हायला हवंस.. आपल्या मामासारखं.’’

‘‘अंहं! सायंटिस्ट बनून मला आपल्या सन्याला मदत करायचीये.’’

‘‘ती कशी बरं?’’

‘‘मी बॉम्ब बनवणार!’’

‘‘काय?’’ रोहनचे हे उद्गार ऐकून आई काही क्षण स्तब्ध झाली.

‘‘आपल्या देशाच्या संरक्षणासाठी बनवणार बॉम्ब!’’

‘‘असे विचार मनात येतात तरी कुठून बाळा? आपले विचार कधीच विध्वंसक असू नयेत!’’

‘‘आज आम्ही वर्गात हेच तर बोलत होतो. आपल्या देशाकडे वाईट नजरेने बघणाऱ्या सगळ्या देशांवर आपले सैनिक मी बनवलेले बॉम्ब टाकतील आणि जगातला सगळा दहशतवादच मुळी संपूर्णपणे नष्ट होईल.’’ रोहन पुढे म्हणत राहिला. आई बेचन झाली. पण तिने त्याचे हे विचार अजून जाणून घ्यायचं ठरवलं.

‘‘बापरे! पण ज्या देशांवर तुझा बॉम्ब पडेल त्या देशांमध्ये इतर चांगली माणसंही राहत असतील, ज्यांचा या दहशतवादाशी काहीच संबंध नसेल! ती चांगली माणसंही हकनाक मारली जातील की यामुळे! मग त्याचं प्रत्युत्तर म्हणून ते देश आपल्यावर हल्ला चढवतील. ते थोडेच गप्प बसतील? तेव्हा कदाचित आपणसुद्धा..’’ आईने रोहनला वेगळा दृष्टिकोन द्यायचा प्रयत्न केला.

‘‘तसं नाही गं! या सगळ्या देशांमधल्या आणि अर्थात आपल्यासुद्धा देशातल्या चांगल्या माणसांना आपण आधी एकत्र एका सुरक्षित ठिकाणी आणायचं आणि जेव्हा फक्त वाईट माणसं उरतील तेव्हा त्यांच्यावर बॉम्ब टाकायचा. कशी वाटली आयडिया?’’

‘‘एकदम फ्लॉप!’’ आईला रोहनची निरागसता भावली होती, पण त्याच्या विचारांना तिला योग्य दिशा द्यायची होती. म्हणून ती मुद्दाम असं म्हणाली.

‘‘फ्लॉप का?’’

‘‘कोण चांगलं, कोण वाईट हे तू कसं ठरवणार? पटेल असं काहीतरी बोल! चर्चेलासुद्धा ‘लॉजिक’ असायला पाहिजे. नाहीतर ते टीव्हीमधल्या निर्थक चर्चेसारखं होतं. नुसतीच आरडाओरडी आणि त्यातून निष्पन्न काहीच होत नाही. आपल्याला सारासार विचार हा करता आलाच पाहिजे.’’ आई निक्षून म्हणाली.

‘‘आई, आपण दररोज टीव्ही, वर्तमानपत्रांतून जे सगळं ऐकतोय, बघतोय, वाचतोय त्याची काही टोटलच लागत नाहीये मला! आज शाळेत शिक्षकांनी मला माइकवरून ‘न्यूज’ वाचायला म्हणून पेपरामधले काही मथळे लिहून आणायला सांगितले होते. काल रात्री ते शोधायला म्हणून कालचा पेपर घेतला वाचायला, तर त्यात लोकांनी किती वेगवेगळी मतं मांडली आहेत! कुणी म्हणतं.. लढाई करा, कुणी म्हणतं- नका करू. कुणी नुसतं म्हणालं, की ‘लढणाऱ्या देशांमध्ये चर्चा झाली पाहिजे’ तर त्याचा निषेध होतो. एका शहीद सनिकाची पत्नी म्हणते ‘लढाई हे शहिदांच्या बलिदानाचं उत्तर नाहीये.’ तेव्हा तिच्या देशभक्तीवर प्रश्न उठतो. हे सगळं पाहून जाम गोंधळ उडालाय मनात. आम्ही वर्गातपण यावर मधल्या सुट्टीत खूप चर्चा करत असतो. तिथेसुद्धा आमचे नुसते मतभेद आणि भांडणं होतात. काय बरोबर, काय चूक, काहीच समजत नाही आम्हाला.’’

‘‘बेटा, लढाया या अनंत काळापासून सुरू आहेत. गेल्या आठवडय़ात मी तुला कुणाची गोष्ट सांगितली रे?’’

‘‘सम्राट अशोकाची!’’

‘‘जो आज सम्राट अशोक म्हणून ओळखला जातो, त्याचं ‘अशोक चक्र’ हे प्रतीक आज आपल्या राष्ट्रध्वजावर विराजमान आहे.’’

‘‘सन्यदलांत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठीसुद्धा जवानांना ‘अशोक चक्र’ देतात नं?’’

‘‘बरोबर! किलग राज्याशी झालेल्या युद्धानंतर अशोक राजाने जेव्हा रणभूमीवर मृत्यूमुखी पडलेले दोन्हीकडचे योद्धे, रक्ताच्या नद्या पाहिल्या तेव्हा त्याचं मन ढवळून निघालं. त्या लढाईमध्ये मिळालेल्या विजयाचं त्याला काहीच वाटेना. त्याने पुन्हा कधीच लढाई केली नाही. शांततेचा मार्ग पत्करून तो एक आदर्श राजा बनला. त्याने अनेक शैक्षणिक संस्था, शुश्रूषालये बांधली आणि आयुष्याच्या अखेपर्यंत शांततेचा प्रचार केला. बेटा, जो प्रत्यक्ष लढाई अनुभवतो त्यालाच तिच्यातला फोलपणा जाणवतो.’’

‘‘याचा अर्थ कुणीही जरी आपल्या देशावर हल्ला केला तरी आपण नुसतं गप्प बसायचं? काहीच उत्तर द्यायचं नाही?’’

‘‘तो मुळी आपला प्रांतच नाहीये. त्याचा विचार करायला आपलं सन्यदल सशक्त आहे, सक्षम आहे. आपण आपल्या जागी नेटाने आपलं काम करावं. कसं आहे, एखाद्या डॉक्टरला ऑपरेशन कसं करायचं किंवा एखाद्या क्रिकेटरला स्क्वेअर कट कसा मारायचा हे सांगण्याची मुळात आपली योग्यता असली पाहिजे. ए. सी. रूममध्ये बसून वाद घालत किंवा शाळेच्या मधल्या सुट्टीत ‘लढाई झालीच पाहिजे’, ‘बदला घ्यायलाच हवा,’ यांसारखे शेरे मारणं खूप सोपं आहे. आणि विशेष करून ज्या मुलाचा मामा सीमेवर तनात आहे त्याने तर अशा वायफळ चर्चामध्ये कधीच आपलं अविचारी मत मांडू नये. एक सजग नागरिक म्हणून आपण प्रथम संयम दाखवून आपल्या सन्याला मदत करायला हवी.’’ रोहनला आईच्या आवाजात एक धार जाणवत होती.

‘‘सॉरी, आई! माझ्या लक्षातच नाही आलं हे!’’

‘‘आपल्या देशाने स्वातंत्र्यानंतर अनेक युद्धं पाहिली. चीनबरोबरच्या युद्धाच्या वेळी आपल्या जवानांकडे आवश्यक ती सामग्रीसुद्धा नव्हती. तेव्हा कितीतरी स्त्रियांनी घरच्या घरी विणलेले स्वेटर, मफलर, शिवलेले कपडे सीमेवर पाठवले होते. डॉक्टर्स आणि नस्रेसची पथकं सीमेवर जाऊन जखमी जवानांची सेवा करत होती. पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धाच्या वेळी सामान्य नागरिक रक्तदान करून आपल्या परीने मदतीचा हात पुढे करत होते. देश एकत्र होता. आज आपण या बोकाळलेल्या सोशल मीडियाच्या माध्यमांतून फक्त वायफळ चर्चा करायची, की आपल्या परीने सन्यदलाला धर्य द्यायचं, हे ज्याचं त्यानं ठरवायचं. मला समजत नाही की अशी चर्चासत्रं चालवणारी मंडळी आपल्या सनिकांचा किंवा त्यांच्या परिवारांचा थोडासा तरी विचार करतात का? हेच बघ नं, आपला मामा सीमेवर असताना मामीकडे आणि दोन वर्षांच्या रियाकडे पाहून आपल्याला कसं वाटतं? ज्याचं जळतं त्यालाच कळतं..’’ बोलताना आईला एकदम गहिवरून आलं.

हे पाहून रोहन पटकन् उठला. त्याने हात धुतले आणि आईला हलकी मिठी मारली. आई लगेच सावरली आणि जेवणाची भांडी आवरायला स्वयंपाकघरात गेली. रोहनने हा सीरियस मूड बदलण्यासाठी म्हणून रेडिओ लावला. आणि त्यातून सूर उमटले.. ‘‘ओ, सारे जग के रखवाले, निर्बल को बल देनेवाले, बलवानों को देदे ग्यान.. सबको सन्मती दे भगवान!’’

mokashiprachi@gmail.com