त्यादिवशी आजी पहाटेच निघाली. अगदी तुरुतुरु चालू लागली. झाडावरच्या राघू पोपटाच्या काही लक्षात येईना, की ही एवढय़ा सकाळी कुठे चालली. बरं रणबीरने तर आताच बांग दिली होती. राघु पोपट अंगणातील bal-lकोंबडय़ाला तो राजिबडा दिसतो म्हणून रणबीर म्हणतो. त्याने झाडावरूनच गल्लीतल्या मोती कुत्र्याला आवाज दिला, ‘‘अहो संरक्षणमंत्री, एवढय़ा पहाटे आजी कुठे निघाल्या आहेत ते पाहा.’’
खरं म्हणजे मोती कुत्र्याचं दुसरं नाव आहे ‘टायगर’. गल्लीतील पोरे त्याला टायगरच म्हणतात; परंतु राघू पोपटाला ते मान्य नाही. वाघांची संख्या कमी झाली म्हणून काय झालं?.. अगदी मोती कुत्र्याला टायगर म्हणण्याची वेळ आलेली नाही, असंच त्यांचं मत आहे.
मोती कुत्रा अर्थातच चिडतो. ‘‘बच्चमजी, झाडावर आहेस म्हणून, नाही तर बघून घेतलं असतं,’’ असा दम भरतो. आजदेखील तो राघू पोपटावर उचकला होता; परंतु आजीसाठी धावणं गरजेच होतं. आजी रोज आपली प्रेमानं भाकरी खाऊ घालते. तेव्हा तिच्यासाठी आळस झटकून उठलं पाहिजे.
‘‘आजी, कुठे निघालीस?’’ मोती कुत्र्यानं विचारलं.
‘‘नाही नाही रे. जरा लेकीची आठवण आली. तिच्याकडे जाऊन येते. नंतर ऊन लागेल म्हणून पहाटेच निघाले. लेकीकडे जाऊन तूप-रोटी खाईन आणि धष्टपुष्ट होईन, मगच परत येईन.’’
‘‘आजी, मी येतो तुला गावच्या वेशीपर्यंत सोडायला.’’
‘‘नको. जाईन मी एकटी.’’
‘‘नको. येतो मी. चोरांचा काय भरवसा?’’ म्हतारीला खूप कौतुक वाटलं.
‘‘धन्य रे बाबा तुझी! कलियुगातदेखील तुझं इमान टिकून आहे.’’
आजी लेकीकडे निघाली. गाव मागे पडलं. काठी टेकत प्रवास सुरू झाला. झाडी दाट झाली. जंगल सुरू झालं. आजीला वाटेत एका झाडाजवळ ससा भेटला.
‘‘काय रे सशा. काय चाललंय?’’
सशाने छानसा आळस दिला आणि म्हणाला, ‘‘काही नाही आजी जेवण झालं, आता वामकुक्षी घेईन म्हणतोय.’’
आजी हसली आणि सशाच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली, ‘‘तू कधी रे सुधारणार? एवढी कासवाबरोबर शर्यत हरलास तरी तुझ्यात सुधरणा होत नाही.’’
‘‘आजी, मी नाही हरलो आमचे खापरपणजोबा हरले.’’
‘‘तेच ते रे.’’
‘‘त्यानंतर मी कासवाशी शर्यतच नाही लावली. त्याच्याबरोबर धावलोच नाही. सांगितली आहे कोणी झंझट!शेंगाच खाल्ल्या नाहीत तर टरफलं येणार कुठून?’’
आजी मोठय़ाने हसली. म्हणाली, ‘‘छान तुझ्या खापरपणजोबांसारखाच तूदेखील भित्रा आणि पळपुटा आहेस.’’
‘‘काय झालं?’’
‘‘अरे, शर्यत हरल्यानंतर जनलाजेला घाबरून तुझा पणजोबा थेट चंद्रावर पळून गेला.’’
‘‘काय सांगतेस?’’
‘‘हो ना! आम्हाला खालून चंद्रावर सशासारखा आकार दिसायचा. मागे नील आर्मस्ट्राँग चंद्रावर गेला तेव्हा त्याला म्हटलं, ‘‘बघ दिसतोय का?’’
‘‘मग भेटले पणजोबा?’’
‘‘छे रे! त्या चंद्रावर काहीसुद्धा नाही. मुळात प्राणिमात्रांच्या जगण्यासाठी आवश्यक असलेली हवाच नाही.’’
‘‘अरेच्चा! मग आहे तरी काय तिथे?’’
‘‘दगड-धोंडे आणि माती.प्रत्यक्षातला चंद्र अगदीच कुरूप आहे. तिथे मोठमोठी विवरं आहेत. मोठाले खडक आहेत. तुझा तो खापरपणजोबा काय खाणार होता? तिथे गवताचं पानदेखील नाही.’’
‘‘आजी तिथे हवा नाही. झाडी नाहीत. म्हणजे खूप उकडत असेल ना?’’ सशाने विचारलं
‘‘चंद्राच्या प्रकाशित भागाच्या पृष्ठभागाचं तपमान १३० डिग्री सेंटीग्रेड इतकं असतं. म्हणजे उकळत्या पाण्यापेक्षा जास्त. अप्रकाशित भागात कडाक्याची थंडी असते.’’  
‘‘आजी, पण चंद्राचा प्रकाश किती शीतल असतो,’’ ससा भाऊक होत म्हणाला. आजीने त्याला उचललं आणि पाठीवरून हळूवार हात फिरवला.
‘‘अरे सोन्या, तो प्रकाश चंद्राचा नाहीच मुळी. चंद्र परप्रकाशित आहे. सूर्याचाच परावíतत प्रकाश आहे तो.’’
‘‘आजी, म्हणजे माणसाची चंद्रावरची फेरी फुकट गेली म्हणायची,’’ कुत्सितपणे ससा म्हणाला. आजी कातावली. सशाला खाली सोडलं.
‘‘मुळीच नाही. माणसाने तिथल्या मातीचे नमुने गोळा केले. त्या मातीत असलेल्या खनिजांचा अभ्यास सुरू केला. माणूस तुझ्यासारखा आळशी नाही. तो मेहनत करतो. विविध  विषयांचा अभ्यास करतो. म्हणूनच त्याची प्रगती सुरू आहे. हे जग चालणाऱ्यांचं आहे. तुझ्यासारख्या आयतोबाचं नाही.’’
आजी उठली आणि शहराच्या दिशेने तरातरा चालू लागली.

डी. व्ही. कुलकर्णी – dvkulkarni1956@gmail.com