विहानच्या घरात खिळ्याला नीट लावून ठेवलेल्या श्रीराजच्या बॅडमिंटन रॅकेटला आता मात्र राहवेना अगदी. तिने विहानच्या बॅडमिंटन रॅकेटला शुक शुक करत हाक मारली. विहानच्या रॅकेटने पहिल्यांदा काहीच उत्तर दिलं नाही. खरं तर ही कशाला आलीय आपल्याबरोबर म्हणून ती वैतागली होती.

‘‘अगं, मी श्रीराजची रॅकेट. श्रीराज मला कोर्टवर विसरला म्हणून विहान एक दिवसापुरता घेऊन आला विसरलीस का?’’ हे ऐकल्यावर तिचा नाइलाज झाला.

‘‘काय गं?’’ विहानची रॅकेट वैतागतच म्हणाली. तिच्या बोलण्यातून नाराजी स्पष्ट जाणवत होती. त्यामुळे घाबरत घाबरतच श्रीराजच्या रॅकेटने तिला विचारलं, ‘‘रोज खेळून आल्यावर तू अशीच नीटपणे जागेवर बसतेस?’’

‘‘हो! का गं?’’ विहानच्या रॅकेटने प्रतिप्रश्न केला.

‘‘खरंच बाई, नशीबवान आहेस तू. नाहीतर आमचं नशीब काय सांगू! आमच्या घरी म्हणजे श्रीराजच्या घरी गेलो ना की तो सगळ्या वस्तू इतस्तत: फेकतो. मला हवेत काय उडवतो, कोचवर काय फेकतो आणि बाकीच्यांचंही तसंच. चपला, बूट, पुस्तकं, खेळणी सगळ्या वस्तू इतक्या वाईट पद्धतीने वापरतो की सारे जण खूप वैतागत असतात त्याच्यावर.’’

‘‘काय सांगत्येस काय? असंही असतं?’’ विहानची रॅकेट आश्चर्याने म्हणाली. ‘‘उलट आमच्याकडे विहान आमची सर्वाची म्हणजे आपल्या वस्तूंची खूप काळजी घेतो. त्याबरोबर छोटय़ा कोमललाही वस्तूंची काळजी घ्यायला शिकवतो. चपला, बूट, खेळणी, पुस्तकं, एवढंच काय बागेतल्या झाडांनाही दोघं अगदी प्रेमाने वागवतात. त्यांचं संगोपन करतात. आजी-आजोबांची काळजी घेतात. आई-बाबांना मदत करतात.’’

‘‘काय म्हणतेस?’’ विहानच्या रॅकेटने तोंडात बोटंच घातली.

‘‘आमच्या घरात सध्या तरी हा कालवा.. घरभर सगळा पसारा. ते बेडशीट अगदी वैतागलं आहे, त्याचा इतका चोळामोळा होतो ना! आणि कोच, रिमोटचं काही विचारू नको. उडय़ा मारून नि फेकाफेकी करून त्यांच्या अंगाचा पुरता पिट्टया पडलाय. आणि घरातल्या मोठय़ांचं काही विचारू नको.’’ श्रीराजच्या रॅकेटनं पुढे सुरू केलं.

‘‘श्रीराज आणि त्याचा भाऊ श्रीदीपनं तर सगळ्यांना हैराण केलंय. आजीला आरडाओरडा नि भांडणं करत दुपारी झोपू देत नाहीत. आईची कामं एवढी वाढवतात की ती हैराण झालीय अगदी. बाबांकडे सुटीसाठी एवढय़ा मागण्या करतात ना दोघेही, काय सांगू तुला? घरातल्या सगळ्यांना सुटी कधी संपते असं झालंय.’’

‘‘बापरे! काय सांगतेस? इथे तर उलटं झालंय. विहानची सुटी संपणार म्हणून सगळे काळजीत आहेत. आई म्हणते, ‘मी काम करत असताना कोमलची काळजी कोण घेणार?’ आजोबा म्हणतात, ‘आता माझी कामं मला उठून करावी लागतील, विहान शाळेत गेला की माझी छोटी-मोठी कामं कोण करणार?’ हे सगळं कान देऊन ऐकणारा टीव्ही म्हणाला, ‘मलाही असंच वाटतंय, की आता चॅनेल सर्फिग कोण करणार?’ विहानही एक छोटा मुलगाच आहे, तोही खोडय़ा काढतो, दंगा, हट्ट, आरडाओरडा, भांडण, मारामारी सगळं काही चालू असतं, पण तो समजूतदार असल्याने सगळं प्रमाणात असतं, त्यामुळे त्याचा शेवट चांगला होतो. तसंच सुटीचं आहे. या सुटीत त्यानेही काही चुका केल्याच, पण चांगल्या गोष्टी जास्त केल्याने सुटीचा शेवट येतोय म्हणून सगळ्यांना वाईट वाटतंय इतकंच.’’ हे ऐकताच श्रीराजच्या रॅकेटला खूप काही उलगडलं आणि हे श्रीराजपर्यंत कसं पोहोचवायचं, या विचारात ती गढून गेली.

आज शिपाईकाकांनी शाळेचे वर्ग स्वच्छ करून व्यवस्थित लावून घेतले. शिपाईकाकांना आता लवकरच शाळा सुरू होणार म्हणून उत्साह वाटत होता. शाळा म्हणजे मुलांचा किलबिलाट, स्पर्धा, परीक्षा, खेळ, हार-जीत, सजावट, बक्षिसं आणि खूप काही. ते सगळं त्यांना खूप आवडतं. वर्गातली बाकं लावून झाल्यावर त्यांनी हळूच त्यावरून हात फिरवला तेव्हाचा आनंद सगळ्या बाकांच्या आणि फळ्याच्या लक्षात आल्यावाचून राहिला नाही.

‘‘आता मुलं येणार का रे शाळेत?’’ एका बाकाने फळ्याकडे चौकशी केली.

‘‘हो, परवापासून, तसंच लिहिलंय माझ्यावर.’’ फळ्याने माहिती पुरवली. ‘‘आता मज्जाच मज्जा ना. गेल्या वर्षी सोनल आणि वरद बसायचे माझ्यावर. खूप धमाल असायची दोघांची.’’ एक बाक बोलायला लागला.

‘‘स्पर्धा केवढी असायची ना दोघांमध्ये?’’ शेजारचा बाक न राहवून नाक मुरडत बोलला. ‘‘नाहीतर माझ्यावर बसणाऱ्या नीना आणि ईशा. कधीच स्पर्धा नाही, भांडणं नाहीत नि अबोला नाही, दोघीही कशा आपलं काम बरं की आपण बरं.’’

‘‘अरे, काय उपयोग त्याचा? विद्यार्थ्यांनी कसं वागायला हवं, सोनल नि वरदसारखं. तू ज्याला स्पर्धा म्हणतोस ना ती स्पर्धा होती, त्यात भांडण किंवा सूड नव्हता. त्यामुळे सोनलचं अक्षर आपल्यापेक्षा चांगलं आहे असं जाणवल्यावर वरदने आपलं अक्षर सुधारण्यासाठी किती प्रयत्न केलाय. मी पाहिलाय ना! आणि सोनलनेही त्याला खूप मदत केली वेळोवेळी. अक्षरांची वळणं सुधारण्यात, शब्दांमधलं अंतर ठरवण्यात. परीक्षेवेळी दोघांनीही एवढय़ा सुंदर हस्ताक्षरात पेपर लिहिला होता ना आणि क्रीडास्पध्रेवेळी जेव्हा वरदला पहिलं बक्षीस मिळालं तेव्हा दोघंही दिवसभर किती आनंदात होते.’’

‘‘भांडणं, मारामारी, चिडवाचिडवीही करायची की दोघंही.’’ परत शेजारचा बाक तक्रार करत म्हणाला.

‘‘करायची की, मी कुठे नाही म्हणतोय, मुलं आहेत ती, अधेमधे असं करणारच. पण ते अगदीच तात्पुरतं असायचं. बाकी, एकमेकांच्या प्रगतीत किती मदत करायचे दोघंही. तुला आठवतं का? नाटकाच्या सरावावेळी वरदला किती मदत केली होती सोनलने. त्याचं पाठांतर घेणं, त्याच्या संवादांचा सराव करून घेणं. एकदा तर बाई ओरडल्या म्हणून त्याने नाटकातून नावच काढून घ्यायचं ठरवलं होतं. त्यावेळी दोघांमध्ये झालेलं बोलणं जवळून ऐकलंय मी. पुन्हा तो नाटकासाठी तयार होण्यासाठीचा आत्मविश्वास मिळाला त्याला त्या बोलण्यातून. बोल चिमखडे असतील, बोलणं निरागस असेल, पण जे साधायचं ते साधलंच.’’ आता फळ्यानेही बोलण्यात उडी घेतली.

‘‘फक्त सोनल आणि वरदपुरतंच नाही तर वर्गातल्या अनेक बाकांनी हे पाहिलंय. मुलं कशी एकमेकांना मदत करतात. एकमेकांवर किती प्रेम करतात. पडलं, झडलं, खरचटलं की सारे एकमेकांच्या मदतीला तत्पर. इतर वर्गाबरोबर स्पर्धा असली की आपल्या वर्गातला प्रत्येकजण कसा जोमाने कामाला लागतो. वाद, भांडणं होतात, पण ती सगळी असतात आपला वर्ग पुढे जाण्यासाठी, त्याची प्रगती होण्यासाठी. जेव्हा इतर शाळांबरोबर स्पर्धा असते तेव्हा आपल्या शाळेतल्या सर्वच मुलांमध्ये एक वेगळा उत्साह संचारलेला असतो. काय करायचं, कसं करायचं, कोणी करायचं, किती वेळा ठरवलं जातं, किती वेळा त्यात बदल केला जातो.’’

‘‘त्यावेळच्या वादविवादात माझी पाठ किती वेळा धोपटली जाते माहित्येय’’ टेबल हसत म्हणालं.

‘‘ते काहीही असो, पण जेव्हा स्नेहसंमेलन, बक्षीससमारंभ वगरे असतं ना तेव्हा हे सगळं कुठल्याकुठे जातं. माझ्यावर रचून ठेवलेली पदकं माझी पाठ कुरवाळतात ना तेव्हा ती धोपटलेली पाठ पुरी विसरून जातो मी.’’

‘‘आणि निरोपसमारंभ?’’ एका बाकाने विचारलं.

‘‘ हो रे..’’ फळा, टेबल नि अनेक बाकं एकदमच ओरडली.

‘‘तेव्हाचे ते लाललाल गाल, ओघळणारे डोळे, लालेलाल नाक सगळं काही आठवतं आणि हीच मुलं मोठ्ठी झाली की अधूनमधून भावूक डोळ्यांनी येतात ते पाहून खूप भरून येतं.’’ फळ्याचं हे बोलणं ऐकता ऐकता सगळे नि:शब्द झाले.

joshimeghana.23@gmail.com